आसाम विधानसभा निवडणुकीचा निकाल नजीक आल्याने काँग्रेसमधील अस्वस्थता वाढू लागली आहे. पक्षासमोर एकाचवेळी अनेक आव्हान आहेत. पक्षाला एकीकडे महाजोत (महाआघाडी)ला एकजूट ठेवावे लागणार आहे, तसेच स्वतःच्या आमदारांनाही सांभाळावे लागणार आहे. याचबरोबर नेत्याची निवड करणेही सोपे ठरणार नाही. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःची दावेदारी सुरू केली आहे.
काँग्रेसने आसाममध्ये सामूहिक नेतृत्वाखाली निवडणूक लढविली होती. माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या निधनानंतर पक्षाकडे कुठलाच मोठा आणि लोकप्रिय चेहरा नव्हता. याचमुळे पक्षाने मुख्यमंत्री पदाच्या दावेदार नेत्यांना प्रचारात उतरविले होते. गौरव गोगोई, सुष्मिता देव, प्रद्युत बोरदोलोई आणि देवव्रत सैकिया यांना आसाम बचाओ यात्रेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती.
प्रचाराची रणनीति यशस्वी
प्रचारादरम्यान पक्षाची रणनीति यशस्वी ठरून सामूहिक नेतृत्वाखाली निवडणूक लढविली होती. पण निवडणूक संपताच मुख्यमंत्री पदाच्या चारही दावेदारांनी स्वतःचे नाव पुढे करण्यास प्रारंभ केला आहे. सर्वच दावेदार विजयाची शक्यता असणाऱया उमेदवारांना स्वतःच्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत आहेत. अधिकाधिक आमदारांचे समर्थन मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
नाव निश्चित करणे अवघड
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनुसार काँग्रेस सत्तेपर्यंत पोहोचल्यास मुख्यमंत्र्याचे नाव निश्चित करणे सोपे ठरणार नाही. तिकीट वाटपादरम्यान पक्षाने नेत्यांना कुठलाच कोटा निश्चित करण्यात आला नव्हता. पण राज्यातील प्रत्येक नेत्यालाही काही आमदारांचे समर्थन प्राप्त होणार आहे. अशा स्थितीत अत्यंत विचारपूर्वक नेतृत्वासंबंधी निर्णय घ्यावा लागणार आहे.
सहकाऱयांची भूमिका महत्त्वाची
आसाममध्ये महाजोत सत्तेवर आल्यास आघाडीतील सहकाऱयांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सर्व सहकारी पक्षांशी चर्चा केल्यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री पदाच्या दावेदारांनी उमेदवारांना एकजूट ठेवण्यास मदत करावी. कुठल्याच पक्षाला पूर्ण बहुमत न मिळाल्यास भाजपला फूट पाडता येऊ नये असेही या नेत्याने सांगितले आहे.