मराठा क्रांती मोर्चाची खासदार सुप्रिया सुळेंकडे मागणी
दसरा चौकातील ठिय्या आंदोलनास खासदार सुप्रीया सुळे यांनी दिली भेट
प्रतिनिधी / कोल्हापूर :
मराठा आरक्षणाचा अंतरीम निकाल होईपर्यंत शासकीय भरतीला स्थगिती देण्याची मराठा समाजाची मागणी आहे. मात्र निकाल लागण्यापुर्वीच शासनाकडून मेगा भरती केली जात आहे. तरी निकाल लागेपर्यंत भरती थांबवा, अशी मागणी सकल मराठा समाजाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली. तरीही भरतीचा प्रयत्न केल्यास राज्यभर उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी निकाल होईपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहन आंदोलकांना केले.
खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी कोल्हापूर दौऱयावर होत्या. यावेळी त्यांनी ऐतिहासिक दसरा चौक येथे मराठा आरक्षण प्रश्न मराठा क्रांती मोर्चाकडून सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनाला भेट देवून आंदोलकांशी चर्चा केली.
याप्रसंगी बोलताना समन्वयक दिलीप पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे. राज्यसेवा लोकसेवा आयोगामध्ये सुरु असलेला मनमानी कारभार समाजासाठी घातक आहे. त्यांच्या हातून जर परीक्षा होणार असेल तर मराठा समाजाची कुचंबना होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आयोगामध्ये मनमानी कारभार करणाऱ्यांना बाजूला करा. अशी मराठा समाजाची मागणी असल्याचे पाटील यांनी सांगितले.
तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळण्यात मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण अपयशी ठरले आहेत. ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. मात्र आरक्षणाच्या लढ्यात ते कमी पडत आहे. याठिकाणी सध्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाची आवश्यकता आहे. तरी चव्हाण यांना हटवून उपसमिती अध्यक्षपदी अभ्यासू व्यक्तिमत्वाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही पाटील यांनी खासदार सुळे यांच्याकडे केली.
यावेळी समन्वयक सचिन तोडकर, स्वप्नील पार्टे, शैलेश जाधव, नितीन देसाई, विरेंद्र मोहीते, धनश्री तोडकर, मेघा क्षीरसागर, जयश्री वायचळ, सरस्वती थोरवत, पुष्पा लोहार, हौसाबाई सुतार, वैशाली शेळके, दिपाली कदम, शिवाजी पाटील, उमेश साळोखे, मधुकर बिरंजे, माधूरी भोसले, प्रसाद जाधव, संजय जमदाडे, डॉ. रवी जाधव, बाबा फरास, गणीभाई आजरेकर, नेहा मस्कर, आदिती मस्कर, प्रतिक्षा मस्कर, प्रणिता मस्कर आदी उपस्थित होते.