खलिस्तानसंबंधी गटाच्या झूम बैठकीत भाग घेतल्याचे केले मान्य
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताला तोडण्याचा प्रयत्न करणाऱया खलिस्तानवादी गटाच्या ‘टुलकिट’ प्रकरणाने आता अधिकच गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खोलवर पसरली असून पोलीस ती उखणण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रकरणात बेंगळूरहून अटक करण्यात आलेल्या दिशा रवीची चौकशी सुरू असून निकिता जेकब आणि महाराष्ट्रातील बीड जिल्हय़ातील शांतनू मुळुक यांच्या भोवती कारवाईचा फास घट्ट होत आहे. जेकबने अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. तिने खलिस्तान्यांनी 26 जानेवारीपूर्वी घेतलेल्या झूम बैठकीत भाग घेतल्याचे मान्य केले.
याच टुलकिट प्रकरणातून 26 जानेवारीच्या गणतंत्रदिन कार्यकमच्या दिवशी दिल्लीत शेतकरी आंदोलकांनी हिंसाचार केला होता. त्यात 500 पोलिस जखमी झाले होते. अनेक पोलिसांना लाल किल्ल्याच्या तटावरून खाली फेकण्यात आले होते. तसेच कथित आंदोलकांनी तिरंगी ध्वजाचाही अपमान केला होता.
टुलकिट प्रकरण काय आहे…
युरोपातील पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हिने दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ट्विट केले होते. त्या ट्विटबरोबर तिने खलिस्तानवाद्यांनी तयार केलेला एक कागदही अनवधानाने शेअर केला. 26 जानेवारीच्या दिवशी दिल्लीत कसा हिंसाचार घडवायचा याची माहिती त्यात होती. तसेच, त्यानंतरही भारतात कसे अराजक निर्माण करायचे, याची कार्यक्रम पत्रिकाच या कागदात होती. थनबर्ग हिने नंतर हे ट्विट डिलिट केले होते.
खलिस्तानवादी कागद भारतातच
थनबर्गने ट्विटसोबत शेअर केलेले खलिस्तानवादी कागदपत्र भारतातच आता अटक करण्यात आलेल्या दिशा रवी व अजून अटक न करण्यात आलेल्या निकिता जेकब आणि शांतनू मुळुक यांनी तयार केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. त्यांच्यासह या कारस्थानात इतरही अनेक व्यक्ती आहेत. त्यातील काही परदेशी वास्तव्यास आहेत. या टुलकिटशी संबंधित अनेक व्यक्ती खलिस्तानच्या फुटीर गटांच्या हस्तक आहेत, असेही पोलिसांनी प्रतिपादन केले आहे.
कारवाईला वेग
दिशा रवीला अटक करण्यात आल्यानंतर कारवाईला निश्चित दिशा मिळाली आहे. थनबर्गने जे टुलकिट प्रसारित केले ते वास्तविक या कारस्थान्यांना उघड करायचे नव्हते. ते केवळ काही विशिष्ट व्यक्तींनाच दाखवायचे होते. तथापि, ते थनबर्गशी शेअर केले गेले. तिने ते प्रसारित करून टाकले. त्यामुळे या भीषण कारस्थानाची माहिती जगजाहीर झाली. त्यामुळे दिशा रवी हिने घाबरून थनबर्ग हिला हे टुलकिट डिलिट करण्याचा संदेश व्हॉट्स्अप वरून पाठविला. या टुलकिटमध्ये आपली (दिशा रवी आणि निकिता जेकब आणि शांतनू मुळुक यांची) नावे आहेत. त्यामुळे हे टुलकिट प्रसारित झाल्यास आमच्यावर पोलीस निश्चितपणे कारवाई करतील, अशी भीतीही या व्हॉर्ट्संअप संदेशात व्यक्त केली गेली होती, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने दिली आहे.
सर्व संदेश पोलिसांच्या हाती
दिशा रवी, थनबर्ग, जेकब, मुळुक आणि इतर सर्व संबंधितांनी एकमेकांना पाठविलेले सर्व संदेश आता पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांच्या आधारावर पुढील तपास सुरू आहे. जेकब हिने वकीलाच्या माध्यमातून आपण झूम बैठकीत सहभागी झाल्याचे मान्य केल्याने तिला अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पीजेएफचे कारस्थान
पोलिसांनी उघड केलेल्या या कारस्थानाशी तसेच दिशा रवी व इतरांशी पोएटिक जस्टीस फाऊंडेशन या खलिस्तानवादी संघटनेचा संबंध असल्याचे याच टुलकिटमधून स्पष्ट होत आहे. त्यामुळे तपासाची दिशा आता या संघटनेकडेही वळविण्यात आली आहे. या संघटनेचा हेतू भारतात राजकीय अस्थिरता निर्माण करणे, अराजक व हिंसा माजविणे आणि भारतात फूट पाडून खलिस्तानवाद्यांना सहकार्य करणे हे आहेत असा पोलिसांनी आरोप केला आहे. या संघटनेने दिशा रवी व इतरांना हाताशी धरून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न चालविला आहे, असे स्पष्ट करत पोलिसांनी पुढील तपास त्वरित केला जाईल असे प्रतिपादन केले.
अटक कायदेशीरपणेच
दिशा रवी हिला कायद्याच्या प्रत्येक नियमाचे पालन करूनच अटक करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी मंगळवारी केले. तिला बेकायदेशीरपणे अटक केल्याचा आरोप काँगेस व इतर विरोधी पक्षांनी केला होता. तसेच काही तथाकथित पुरोगाम्यांनीही सरकारवर टीका केली. तथापि, हे सर्व आरोप धादांत खोटे असून एका गंभीर देशविरोधी कारस्थानाचा शोध दिल्ली पोलीस लावत असताना विरोधी पक्ष स्वार्थी आणि संकुचित राजकारण करून देशविरोधी शक्तींना साहाय्यच करीत आहेत, असा प्रत्यारोप भाजपने केला आहे.
आंदोलनाला अल्प प्रतिसाद
दिशा रवीच्या अटकेविरोधात विरोधी पक्षांनी काही ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्याला लोकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला असाही आरोप होत आहे. विरोधी पक्षांनी चौकशी पूर्ण झाल्याखेरीच आधीच आंदोलने करून स्वतःची कोंडी करून घेऊ नये, असे मत अनेक सूज्ञ नागरीकांनी व्यक्त केले.