प्रतिनिधी / मिरज
निकृष्ट दर्जाच्या आणि अपुऱया पाणी पुरवठा योजना, एलईडी घोटाळ्याची बंद झालेली चौकशी, मोठय़ा प्रमाणात थकलेली घरपट्टी-पाणीपट्टी वसुली अशा अनेक प्रकरणी पंचायत समितीमधील लोकप्रतिनिधींनी अधिकाऱयांना सक्तीने कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. ग्रामसेवकांच्या कामाबद्दल नाराजीही व्यक्त करताना रिक्त पदाबाबत जिल्हा कृषि अधिकाऱयांकडे पाठपुरावा करण्याचे निश्चित झाले. सभापती सौ. शुभांगी सावंत अध्यक्षस्थानी होत्या.
मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी सौ. शुभांगी सावंत आणि उपसभापती पदी राहूल सकळे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी सभापती निवासमध्ये सर्व विभागाच्या प्रमुख अधिकारी आणि कर्मचाऱयांची आढावा बैठक आयोजित केली होती. बैठकीला सभापती, उपसभापतींसह अनिल आमटवणे, अशोकराव मोहिते, विक्रम पाटील, काकासाहेब धामणे, अजयसिंह चव्हाण, रंगराव जाधव, कृष्णदेव कांबळे, सतीश कोरे, किरण बंडगर, दिलीपकुमार पाटील, सौ. शालन भोई, सौ. सुवर्णा कोरे, सौ. जनाबाई पाटील, सौ. सुनिता पाटील, सौ. सुमन भंडारे, सौ. जयश्री डांगे, सौ. त्रिशला खवाटे, सौ. गीतांजली कणसे, सौ. छाया हत्तीकर, सौ. पूनम कोळी यांच्यासह गटविकास अधिकारी आप्पासा सरगर, सहाय्यक अशोक बांगर उपस्थित होते.
यावेळी पंचायत समितीमधील सर्व विभागाच्या प्रमुखांनी आपला आढावा सादर केला. यामध्ये पशुसंवर्धन, बांधकाम, ग्रामपंचायत, समाजकल्याण, कृषी, छोटे पाटबंधारे, ग्रामीण पाणी पुरवठा, शिक्षण, महिला व बालकल्याण आणि अर्थ विभागाचा समावेश होता. ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधीची कमतरता असली तरी शासकीय पातळीवर अनेक योजनांची अंलबजावणी केली जाते. त्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी अधिकाऱयांनी सतर्क रहावे, असे आवाहन सभापती सौ. शुभांगी सावंत आणि उपसभापती राहूल सकळे यांनी केले.
तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीमधील एलईडी घोटाळा झाला असल्याचे स्पष्ट झाले असतानाही गेल्या काही महिन्यांपासून याची चौकशी बंद झाली आहे. घोटाळा उघडकीस आल्यानंतर दोन गटविकास अधिकारी बदलून गेले. पण, अद्याप यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे तुमच्या कालावधीत तरी हा घोटाळा चव्हाटय़ावर येणार का? असा प्रश्न आप्पासा सरगर यांना विचारण्यात आला. काकासाहेब धामणे, अनिल आमटवणे, कृष्णदेव कांबळे, अशोकराव मोहिते यांनी याकडे लक्ष वेधले होते. जबाबदार ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करण्याबरोबर संबंधीत ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. ग्रामसेवकांच्या कारभारावर यावेळी अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
ऑनलाईन बदल्या प्रक्रियेला सदस्यांनी विरोध दर्शविला. तशा बदल्या करण्यासारखी भौगोलिक परिस्थिती आपल्या तालुक्यात नाही, असे राहूल सकळे म्हणाले. दुधगांव, समडोळीच्या ग्रामविकास अधिकाऱयाबद्दलही बैठकीत तक्रारी झाल्या. मासिक सभेत कधीही न बोलणाऱया काही महिला सदस्यांनी आढावा बैठकीत मात्र अधिकाऱयांना प्रश्न विचारण्यात पुढाकार घेतला. घरपट्टी, पाणीपट्टी वसूलीसाठी वेळप्रसंगी पोलीस बंदोबस्त घेण्याबरोबर त्यासाठी चार पथके नियुक्त करावीत, असे सदस्यांनी सुचित केले.
तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक पाणी पुरवठा योजना निकृष्ट दर्जाच्या झाल्या असून, काही योजना तर पाणी सुरू होण्यापूर्वीच बंद पडल्या आहेत. त्यामुळे या संपूर्ण योजनांची लेखी माहिती सदस्यांना द्यावी, अशी मागणी यावेळी झाली. या योजनांमध्ये मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, पूर्वभागातील या योजनांची चौकशी लावणार असल्याचा इशारा सभापती सौ. शुभांगी सावंत यांनी दिला. अनेक कामांची मुदत संपलेली असतानाही या योजना अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. काही योजना पूर्णत्वास येण्यापूर्वीच बंद पडलेल्या आहेत. अशा कामांची माहितीही सौ. सावंत यांनी मागविली. यासह कृषी, आरोग्याधिकाऱयांना सतर्क राहून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा, असे सुचित करण्यात आले. पंचायत समितीमधील रिक्त पदासाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करण्याची हमीही यावेळी सदस्यांनी दिली.