उपमुख्यमंत्री कारजोळ यांच्या उत्तरावर असमाधान
प्रतिनिधी / बेंगळूर
सार्वजनिक बांधकाम खात्याशी संबंधित विकासकामांच्या मुद्दय़ावर उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिलेले उत्तर योग्य नसल्याचा ठपका ठेवून निजद आमदारांनी सोमवारी विधानसभेत धरणे आंदोलन केले. प्रश्नोत्तर चर्चेवेळी निजद आमदार कृष्णा रेड्डी यांनी चिंतामणी मतदारसंघातील विकासकामांसंबंधी प्रश्न उपस्थित केला. त्यावर कारजोळ यांनी उत्तर दिले.
उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी उत्तर देताना चिंतामणी मतदारसंघात 8 कोटी रुपये खर्चाच्या कामांची निविदा प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. लवकरच या कामाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला प्रारंभ करण्यात येईल, असे सांगितले.
मात्र, या उत्तरावर निजद आमदारांचे समाधान झाले नाही. दोन वर्षांपासून येथील विकासकामे प्रलंबित आहेत. अशा प्रकारची कामे करण्यास सरकार हवेच कशाला? असा परखड प्रश्न आमदार कृष्णा रेड्डी यांनी उपस्थित केला. त्यावर मंत्री कारजोळ यांनी त्वेषाने बोलण्याने कोणताही उपयोग होणार नाही, असे खडसावले. त्यामुळे निजद आमदार संतप्त झाले. त्यांनी आपल्या मतदारसंघांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. आपल्या प्रश्नांना योग्य उत्तरे मिळत नाहीत, विकासकामांसाठी अनुदान मंजूर केले जात नाहीत, असा आरोप करून सभाध्यक्षांच्या आसनासमोर धरणे आंदोलन छेडले.
सभाध्यक्षांच्या विनंतीनंतर धरणे मागे
त्यावेळी सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी निजद आमदारांना पुढील प्रश्न विचारण्याची सूचना केली. मात्र, आपण धरणे आंदोलन करत असताना प्रश्न कसा उपस्थित करणार, असे सांगून आधीच्या प्रश्नावर योग्य उत्तर मिळवून द्या, अशी मागणी केली. त्यानंतर सभाध्यक्षांनी सरकार तुमच्या मागण्यांची दखल घेत आहे. त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केल्यानंतर निजद आमदारांनी धरणे मागे घेतले.