बेंगळूर : निजद-काँग्रेस युती सरकारच्या काळात आपण मुख्यमंत्री असून देखील कारकूनप्रमाणे काम करत होतो, असे विधान माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, आपल्या माहितीप्रमाणे निजद राजकीय पक्ष नव्हेच, अशी कोपरखळी मारली आहे. येथे पत्रकारांशी ते बोलत होते. निजद नेते संधीसाधू राजकारणी आहेत. ‘जेडीएस नॉट अ पॉलिटीकल पार्टी’. त्यामुळे त्या पक्षाशी तडजोड करण्याचा प्रश्नच नाही, अशा शब्दात सिद्धरामय्या यांनी निजद नेत्यांची खिल्ली उडवली.
अर्थसंकल्पातून अपेक्षा नाहीत
सोमवारी संसदेत मांडण्यात येणाऱया केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, अर्थसंकल्पातून आपल्याला कोणत्याही अपेक्षा नाहीत. आर्थिक सर्वेक्षणाविषयी देखील केंद्रीय नेते खोटे बोलत आहेत. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर जीडीपी पाताळात जाऊन पोहोचला आहे. कोरोनासारख्या कठीण परिस्थितीतही देशाचा असणारा 4.2 जीडीपी आता -7.7 आहे. मात्र, केंद्र सरकार देशातील जनतेला चुकीची माहिती देत आहे. देशात बेरोजगारीची समस्या वाढत आहे. शहरी भागात 9.2 टक्के तर ग्रामीण भागात 8.9 टक्के बेरोजगारी आहे. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना देशातील बेरोजगारीचे प्रमाण 2.9 टक्के होते. आता देशात 9.5 टक्के पदवीधर, तांत्रिक विभागाचे विद्यार्थी बेरोजगार आहेत. कृषी आणि उद्योग क्षेत्राच्या विकासावर अधिक भर दिला नाही तर देशाचा विकास शक्य नाही, अशी टीकाही त्यांनी केली.