आरोग्य-पोलीस प्रशासनाकडून तपास मोहीम गतिमान : चिकोडी विभागातील परतलेले 15 जण होम क्वारंटाईन
वार्ताहर / चिकोडी, कुडची, हुक्केरी
दिल्ली येथील निजामुद्दीन या भागात तबलिगी जमात या इस्लाम धर्मीय संस्थेच्या कार्यक्रमात चिकोडी विभागातील जवळपास 29 जण सहभागी झाले होते. यामधील 15 जण 18 तारखेला आले असून त्यांना क्वारंटाईन विभागात दाखल करण्यात आले आहे. तसेच दिल्लीवारी केलेल्यांमध्ये काही नेत्यांचाही सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान परतलेल्या भाविकांसह ते आणखी कोणाच्या संपर्कात आले आहेत काय?, याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी जिल्हा आणि तालुका आरोग्य खात्यासह पोलीस प्रशासनाने तपास मोहीम हाती घेतली आहे.
गेल्या तीन दिवसापासून दिल्लीच्या निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या भाविकांमुळे अनेकांची धास्ती वाढली आहे. चिकोडी विभागातील चिकोडी, निपाणी, रायबाग, कागवाड, अथणी येथील अधिकृतरित्या 29 जणांची नावे मिळाली असून त्यामधील 15 जण 18 तारखेलाच कार्यक्रम आटोपून आले आहेत. पण हे 15 जण घरी न जाता दर्ग्यामध्येच वास्तव्यास असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. यानंतर या 15 जणांना जिल्हा व तालुका प्रशासनाने शोधून हॉस्पिटलमधील क्वारंटाईन विभागात दाखल केले आहे. याबरोबरच हुक्केरी तालुक्यातील 5 जणांचीही तपासणी करण्यात आली आहे.
तसेच रायबाग तालुक्यातील कुडची येथील 13 जणांना आणि हारुगेरीमधील एकाला बेळगाव येथे दाखल करण्यात आले असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. दिल्लीचा कार्यक्रम आटोपून अनेकजण गावी आले आहेत. यामुळे ते जर कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले असतील तर ती त्यांच्यासाठीही धोक्याची घंटा आहे. याबरोबर ते आणखी कोणाच्या संपर्कात आले आहेत. त्यांनाही याचा फटका बसण्याबरोबरच संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
चिकोडी शहरातील 14 जणांचा सहभाग
दिल्लीच्या निजामुद्दीन येथील कार्यक्रमात चिकोडी शहरातील 14 जण सहभागी झाल्याचे समजते. यामधील 4 जण परतले असून त्यांना होम क्वारंटाईनमध्ये दाखल केले आहे. तसेच त्यांचे रिपोर्टही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 2 जण महाराष्ट्रातील सातारा जिल्हय़ात असून दोघांचा संपर्क होत नाहे. तर 6 जण दिल्लीहून अद्यापही परतले नसल्याचे समजते. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
हुक्केरीत प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश
दिल्लीतील निजामुद्दीन भागात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात हुक्केरी तालुक्यातील पाच जण सहभागी झाले होते. प्रशासनाने या पाचही जणांची चौकशी करून त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे दिसून आले. तरीही खबरदारी म्हणून प्रशासनाने आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. नोडल अधिकारी जयश्री शिंत्रे, तहसीलदार अशोक गुराणी, गटशिक्षणाधिकारी मोहन दंडीन, सीपीआय गुरुराज कल्याणशेट्टी यांच्यासह टास्कफोर्सच्या सदस्यांनी होसूर येथील मोरारजी वसती शाळेत तळ ठोकून संबंधितांची चौकशी व तपास चालविला आहे. तालुका कुटुंब कल्याण अधिकारी उदय कुडची व त्यांच्या सहकाऱयांनी या व्यक्तींची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन केले आहे.
कुडची येथे बाहेरुन आलेल्यांची माहिती द्या
कुडची येथे बाहेरुन आलेल्यांची माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक एस. व्ही. गिरीश यांनी केले. नगरपरिषदेच्या कार्यालयात आयोजित मौलाना, प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. खरी माहिती दिल्यास संबंधितांची वैद्यकीय तपासणी करण्यास सोपे होईल. त्यामुळे कोणीही माहिती लपवून ठेवू नये. भाविकांनी आपापल्या गल्लीत नमाजपठण करून कोरोनाशी कसे लढावे हे इतरांनाही सांगावे. विनाकारण फिरणाऱयांना आवरण्याचा सल्लाही उपअधीक्षकांनी दिला. बैठकीत काहींनी वैद्यकीय उपचारासाठी मिरजेला जाण्याची परवानगी मागितली. यावेळी गिरीश यांनी, आपण कागवाडपर्यंत सोडण्याची जबाबदारी घेतो. मात्र महाराष्ट्र पोलीस रुग्णास हद्दीत घेतील की नाही याची जबाबदारी आपण घेणार नाही, असे सांगितले.
यावेळी मुख्याधिकारी एम. ए. महाजन, फौजदार शिवराज दरीमोड, मुस्ताक नागसिराज, सादीफ सज्जन, दत्ता सन्नकी, वाशालाल रोहिले, मोहिसीन मारुफ, मौलाना अल्ताफ पटाईट, अतिफ पटाईट, रफिक दऊ, अश्पाक अलालखान, सोहेल जिनाबडे, महमदहुसेन मोरेपिरजादे, मेहबूब पाशा, चमनशेख यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
चौकट करणे…
अफवांवर विश्वास ठेवू नये…
दिल्ली येथून परतलेल्या संशयितांबरोबरच बेंगळूरहून मध्यप्रदेशला जाणाऱया 95 कामगारांनाही हुक्केरी येथील मोरारजी वसती शाळेत ठेवण्यात आले आहे. त्यांच्या व्यवस्थेसाठी गटशिक्षणाधिकारी मोहन दंडीन, समाजकल्याण अधिकारी बसवराज गार्गी यांची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणालाही संशय वाटल्यास त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवानंद गुडगनट्टी यांनी केले आहे.
चौकट करणे…
‘ते’ 1500 प्रवाशांच्या संपर्कात
दिल्लीतील कार्यक्रमानंतर चिकोडी विभागातील विविध भागात पोहचलेले भाविक हे रेल्वेने आल्याचे समजले आहे. यामुळे तालुका प्रशासनाने क्वारंटाईनमध्ये असणाऱया 15 जणांची चौकशी केली असता दिल्लीहून चिकोडी भागात आलेले हे भाविक जवळपास 1500 हून अधिक लोकांच्या संपर्कात आल्याचे तालुका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. रेल्वे प्रशासन व दिल्ली येथील प्रशासनास सदर माहिती देण्यात आली आहे. या 15 जणांच्या सोबत प्रवास केलेल्या 1500 जणांची यादी तालुका प्रशासनाला मिळाली असून त्या सर्वांची चौकशी करण्यात येत आहे.
चौकट करणे…
14 जणांचा शोध सुरू
रेल्वे प्रशासनाला सोबत घेऊन 18 तारखेला ज्या रेल्वेतून 15 जण दिल्लीतून आलेत. त्या रेल्वेतील इतर नागरिकांचे मोबाईल नंबर घेऊन त्यांना वैयक्तिरित्या संपर्क साधला जात आहे. यामध्ये विविध धर्मातील प्रवासी व भारतीय जवानांचा समावेश असल्याचे समजते. दिल्लीतील निजामुद्दीन कार्यक्रमात गेलेल्या 29 पैकी 15 जण परतले असून त्यांना क्वारंटाईनमध्ये दाखल केले आहे. तर उर्वरित 14 जण अद्यापही परतले नसल्याने त्यांचा शोध सुरू आहे.
चौकट करणे…
ते सिमकार्ड निपाणीतील पण…
दिल्ली निजामुद्दीन भागातील कार्यक्रमात निपाणी शहरातील एकाचा समावेश असल्याचे प्राथमिक टप्प्यात दिसून आले होते. मात्र संबंधित व्यक्ती ही त्या कार्यक्रमास गेलीच नव्हती. याउलट त्या व्यक्तीच्या नावचे मोबाईल सिमकार्ड वापरणाऱया बागलकोट जिल्हय़ातील एकाने त्या कार्यक्रमात हजेरी लावली होती, असे पोलीस तपासात दिसून आले. त्यामुळे निपाणीतील कोणीही निजामुद्दीन येथील कार्यक्रमात हजर नसल्याचे सीपीआय संतोष सत्यनायक यांनी सांगितले. यासंबंधी स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून त्याला ताब्यात घेतले आहे. त्याची तपासणीही करण्यात आल्याचे समजते. दरम्यान यामुळे निपाणीसह ग्रामीण भागात चर्चेला उधाण आले असून शहरात भीतीचे वातावरण पसरण्याबरोबरच अफवांनाही ऊत आला आहे.