तलावात पाणी सोडल्याने जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
निडगल (ता. खानापूर) येथील तलावामध्ये साईस्टोन सिद्धेश्वर या फरशी टाईल्स कटिंग कारखान्याचे पाणी सोडले जात आहे. त्यामुळे गाळ जाऊन हा तलाव पूर्णपणे बुजला आहे. याबाबत कारखाना मालकाकडे तक्रार केली असता तो दाद देण्यास तयार नाही. त्यामुळे या परिसरातील शेतीला मोठा फटका बसत आहे. तेव्हा तातडीने त्या कारखान्यावर कारवाई करावी, अशी मागणी निवृत्त सुभेदार विठ्ठल बळवंत कदम यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निडगल येथील सर्व्हे क्रमांक 20 व 22 मधील 2 एकर 2 गुंठे व 16 गुंठे अशी आमची शेत जमीन आहे. या जागेतील 20 गुंठे जागेमध्ये वर्षभर पाणी साठविण्यासाठी तलाव आहे. या तलावाच्या पाण्यामुळेच आम्ही भातपिके घेतो. याचबरोबर तलावातील पाणी जनावरे धुण्यासाठी वापरले जाते. मात्र गर्लगुंजी, इदलहोंड रेल्वेस्टेशनवर असलेल्या फरशी कारखान्यातील दूषित पाणी या तलावामध्ये सोडले जात आहे. त्यामुळे तलाव गाळाने पूर्णपणे भरला आहे. तेव्हा संबंधितांवर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.