मुरगूड / वार्ताहर
निढोरी ता. कागल येथील प्रभाग क्र. २ च्या पोटनिवडणूकीत समरजितसिंह घाटगे यांचे नेतृत्व मानणाऱ्या स्थानिक सुर्यवंशी गटाच्या सुनंदा शंकर कळमकर या १५९ मतांनी विजयी झाल्या. हा विजय सुर्यवंशी गटाला नवे बळ देणारा ठरला आहे.
ग्राम पंचायतीत मंडलिक – मुश्रीफ गटाचे सरपंचपदासह बहुमत आहे. मुश्रीफ गटाच्या राधाबाई विठ्ठल पाटील यांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी काल ८६. ५८ टक्के मतदान झाले होते. प्रतिस्पर्धी उमेदवार मंत्री हसन मुश्रीफ गटाच्या ऋतूजा रोहीत पाटील यांचा या निवडणूकीत मोठ्या फरकाने अनपेक्षितरित्या पराभव झाला. नोंदवलेले मतदान – ६२६, सुनंदा कळमकर ( विजयी ) ३८९, ऋतुजा पाटील ( पराभूत ) २३०, नोटा मतदान -०७ यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुरेश जंगले, तहसीलदार शिल्पा ठोकडे, तलाठी शमा मुल्ला, सर्कल माधव व्हरकट आदीनी कामकाज पाहिले.
आघाडीत बिघाडी !
सत्तारुढ आघाडीतील मुश्रीफ गटांतर्गत नेत्याच्या सुनेच्या या पराभवाने पंचायतीतील कमी झालेल्या संख्याबळाचा सत्ता स्थानावर परिणाम होणार नसला तरी आघाडीच्या नेत्यांना हा पराभव आत्मचिंतन करायला लावणारा तसेच येत्या ८-९ महिन्यानंतर येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी ‘आघाडीत बिघाडी’ करणारा ठरला आहे.