नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पेगॅसस प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यावरही शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, मी नितीश कुमार यांचा आभारी आहे. ते नेहमीच एक आदर्श नेते राहिले आहेत. आज ते सरकारसोबत आहेत पण त्यांचं मन आमच्यासोबत आहे, मला माहित आहे. सरकार देशाची मन की बात ऐकत नाही. आम्ही सरकारची मन की बात ऐकत आलो आहोत. पण आमची मन की बात ऐकली जात नाही. जर ते म्हणत असतील की ‘पेगॅसस’ प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, तर विरोधी पक्ष ही तेच म्हणत आहेत जे त्यांनी सांगितलं आहे.
पेगॅसस पाळत प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यास बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी अनुकूलता दर्शवली होती. पेगॅसस पाळत प्रकरणाच्या या वादाबाबत मी वर्तमानपत्रांमध्ये जे काही वाचले आहे, तेवढीच मला या विषयाबाबत माहिती आहे, असे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.