ऑनलाईन टीम / मुंबई :
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी राज्यात राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू असताना शिवसेनेचे कार्यकर्ते कंत्राटदारांच्या यंत्रसामुग्रीची जाळपोळ करतात. अधिकारी, कर्मचारी-कामगारांमध्ये दहशत निर्माण करून काम बंद पाडतात, अशी तक्रार केली आहे. तसेच हे असेच चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची कामे मंजूर करण्यासंदर्भात आमच्या मंत्रालयाला गांभीर्याने विचार करावा लागेल, असा इशारा देखील दिला आहे.
त्यांच्या पत्रावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. पण, एका भागात रस्ते उभारणीत कोणी त्रास देत असेल तर संपूर्ण शिवसेना दहशत पसरवत आहे हे बोलणे चुकीचे आहे. कारण काही माणसे आज गडकरींसोबत आहेत, ज्यांनी मुंबई गोवा रोडवर तुमच्याच अधिकाऱयांना काळे फासले. काळे फासणारे, दहशत निर्माण करणारे, उठाबशा काढायला लावणारे, चिखलफेक करणारी माणसे आज तुमच्याबरोबर आहेत. तिथे तुम्ही गप्प का? असा सवाल अरविंद सावंत यावेळी उपस्थित केला आहे.
पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख आहेत. त्यांनी या प्रकरणी पोलिसांना अहवाल मागवायला सांगितले आहे. दहशत घालणारे नक्की कोण आहेत, ते शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत का? हे आधी पाहावे लागेल. जर कोणी शिवसेनेचा कार्यकर्ता असेल तर पक्षप्रमुख त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचेही सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.