मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्यात रस्तेबांधमीची कामं करत असताना शिवसेनेच्याच लोकप्रतिनिधींकडून अडथळा आणला जात असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केली होती. नितीन गडकरी यांनी एक खरमरीत पत्रच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं होतं. असाच प्रकार सुरू राहिला, तर राज्यातील रस्त्यांची कामं मंजूर करताना विचार करावा लागेल, असा इशारा देखील नितीन गडकरी यांनी आपल्या पत्रात दिला होता. त्या पत्राच्या मुद्द्यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.
नागपूर मेट्रोच्या सिताबर्डी ते कस्तुरचंद पार्क या मार्गाचे आणि फ्रीडम पार्कचे उद्धाटन आज करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन संवाद साधताना गडकरींच्या पत्रावर उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, नितीनजी तुम्ही बोलता फार प्रेमळ पण पत्र कठोर लिहिता. मात्र तुमचं-आमचं नात थोडं वेगळं आहे. तुम्ही कर्तव्यकठोर आहात आणि आम्हीही. शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे, की जनतेशी कधीही गद्दारी करायची नाही. त्यांचा विश्वासघात करायचा नाही. ती शिकवण तुम्ही सुद्धा घेतली. जनतेच्या विकासाच्या कामाच्या कुणालाही आड येऊ देणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्य सरकार म्हणून ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे तिथे प्रत्येक पाऊलावर आपण एकमेकांसोबत राहून महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करू, हे करतांना जनतेचे हित आणि राज्याच्या विकासाआड कुणालाही येऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली.
काय म्हणाले होते गडकरी पत्रात?
नितीन गडकरी यांनी आपल्या पत्रामध्ये शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी कामांमध्ये अडथळे आणून कंत्राटदारांना त्रास देत असल्याची तक्रार केली आहे. दोन पानी पत्रात राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी अडथळा आणत असल्याची तक्रार गडकरी यांनी केली आहे. राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांत तीन ठिकाणी नियमबाह्य कामांसाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांना त्रास दिला जात आहे, यामुळे काम बंद पडण्यापर्यंत परिस्थिती गेली आहे. ही परिस्थिती कायम राहिली तर कामे सुरु ठेवावीत का ? याचा विचार आपला विभाग करत आहे. कामात अडथळे आणणारी अशी परिस्थिती कायम राहिली तर यापुढे राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामे मंजूर करण्याबाबात विचार करावा लागेल, असा गंभीर इशारा गडकरींनी पत्रातून दिला आहे.