रालोआच्या बिहार विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड : सरकार स्थापनेची विनंती मान्य
पाटणा / वृत्तसंस्था
सलग चौथ्या कालावधीसाठी संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांचा आज सोमवारी बिहारच्या मुख्यमंत्रिपदी शपथविधी होणार आहे. तत्पूर्वी रविवारी त्यांची बिहार विधिमंडळ पक्षातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) नेते म्हणून त्यांची एकमुखी निवड करण्यात आली. या बैठकीला भारतीय जनता पक्ष, संयुक्त जनता दल, हिंदुस्थान आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पक्ष या चारही घटकपक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना केंद्रीय निरीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
रविवारी दुपारी साडेबारा वाजता नितीशकुमार यांच्या निवासस्थानी रालोआच्या घटकपक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. नुकत्याच पार पडलेल्या आणि चुरशीने लढल्या गेलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआचा विजय झाला असून या आघाडीला विधानसभेच्या 243 जागांपैकी 125 जागा प्राप्त झाल्याने पूर्ण बहुमत मिळाले आहे. 10 नोव्हेंबरला निवडणुकीचा परिणाम घोषित झाला.
मोदींकडून दुजोरा
निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर पुढील मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड केली जाईल यासंबंधी उत्सुकता होती. या निवडणुकीत भाजपला 74 तर संजदला 43 जागा मिळाल्या होत्या. भाजपला जास्त जागा मिळाल्याने मुख्यमंत्रीपदी या पक्षाच्या नेत्याची निवड व्हावी, अशी इच्छा व्यक्त होत होती. तथापि, 11 नोव्हेंबरला दिल्लीत भाजपच्या मुख्यालयासमोर कार्यकर्त्यांच्या सभेत बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे पुढचे मुख्यमंत्री नितीशकुमारच असतील, असा स्पष्ट संकेत दिला होता. त्यामुळे या प्रश्नावर पडदा पडला होता.
निर्णय रालोआवर
आपल्या पक्षाला कमी जागा मिळाल्याने प्रारंभी नितीशकुमार मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास राजी नव्हते, असे वृत्त काही संस्थांनी दिले होते. त्यांनी आपले त्यागपत्र राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे शनिवारी सोपविले होते. मात्र, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यास राजी केले. नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय रालोआनेच घ्यावा, असे सुचविले होते. त्यामुळे रविवारी रालोआच्या बिहार विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित केली गेली. या बैठकीत नितीशकुमार यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपने ठेवला होता.
विरोधी पक्षांची टीका
मुख्यमंत्रिपदासंबंधी रालोआने घेतलेला निर्णय नितीशकुमार यांनी मान्य केल्यानंतर प्रमुख विरोधी पक्ष असणाऱया राजदने त्यांच्यावर टीका केली. संजदची सदस्यसंख्या अवघी 43 आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ती बरीच घसरली आहे. त्यामुळे जनादेश नितीशकुमार यांच्या विरोधात आहे. परिणामी, त्यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारणे हा जनादेशाचा अवमान आहे, असे राजदचे म्हणणे आहे.
उपमुख्यमंत्रिपदी दोघांची निवड?
रविवारच्या बैठकीत सरकार स्थापनेसंबंधीही चर्चा करण्यात आली. दोन उपमुख्यमंत्री नेमण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या हे पद भाजपचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांच्याकडे आहे. मात्र नव्या सरकारमध्ये तेच उपमुख्यमंत्री असतील का, यासंबंधी निश्चित माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री किती व कोणकोण हे नंतर स्पष्ट होणार आहे.
राज्यपालांकडून निमंत्रण
विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर त्वरित नितीशकुमार यांनी राज्यपाला फागू चौहान यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेचे आमंत्रण दिले. त्यानुसार आज सोमवारी दुपारी चार ते साडेचार वाजण्याच्या आसपास त्यांचा राजभवनात शपथग्रहण समारंभ होणार आहे.