वृत्तसंस्था / पटना
संजदचे नेते नितीश कुमार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा भंग करण्याची शिफारस करण्यात आल्यानंतर त्यांनी राजीनामा राज्यपालांकडे सादर केला. शुक्रवारी रालोआतील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली असून दिवाळीनंतर नव्या नेत्याच्या निवडीसंबंधी नवनिर्वाचित आमदारांची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. नितीश कुमार यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली.
सत्ता राखल्यानंतर आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी आता बिहारमध्ये नवे सरकार स्थापन करण्यास सज्ज झाली आहे. सरकार स्थापनेची प्रक्रिया दिवाळीनंतर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सध्या त्यांनी राजीनामा दिला असला तरी मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा जेडीयूचे अध्यक्ष नितीशकुमार हेच सांभाळतील, असेही सूचित होत आहे. रविवारी होणाऱया संयुक्त बैठकीत नव्या नेत्याची निवड अपेक्षित आहे.
बिहारची सत्ता मिळवण्यासाठी रालोआ आणि विरोधकांच्या महाआघाडीत अतिशय अटीतटीची लढत झाली. त्यामध्ये काठावरचे बहुमत मिळवणाऱया रालोआची सरशी झाली. राज्यातील 243 पैकी 125 जागा रालोआने जिंकल्या. तर विरोधकांच्या महाआघाडीला 110 जागा मिळाल्या. रालोआने सत्ता आपल्याकडेच ठेवण्यात यश मिळवले असले तरी संख्याबळामुळे त्या आघाडीतील समीकरणे बदलली आहेत. भाजपने 74 जागा जिंकून नितीशकुमार यांच्या संजदला (43 जागा) खूप मागे टाकले. त्यामुळे भाजप मुख्यमंत्रिपदावर दावा सांगू शकतो, अशी चर्चा सुरू झाल्यामुळे गोंधळाचे वातावरण होते.