ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहार पोलिसांनी काढलेले एक फर्मान सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. एखाद्या व्यक्तीने सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन केल्यास आणि या आंदोलनात त्याच्या हातून काही घुन्हा घडल्यास त्याला सरकारी नोकरी किंवा कंत्राट मिळणार नाही, असे फर्मानच बिहार पोलिसांनी काढले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या पोलीस महासंचालकाने 1 फेब्रुवारी 2021 रोजी हे पत्र जारी केले आहे. एखादा व्यक्ती विरोध प्रदर्शन करत असेल, रास्ता रोको करत असेल आणि त्यावेळी त्याने काही गुन्हा केल्यास आणि पोलिसांनी हा गुन्हा सिद्ध केल्यास त्याच्या चारित्र्याच्या प्रमाणपत्रात त्याचा स्पष्टपणे उल्लेख केला जाईल. तसेच अशा व्यक्तीला नंतर गंभीर परिणामांना समोरे जावे लागेल. कारण या व्यक्तीला पुढे सरकारी नोकरी किंवा सरकारी कंत्राटे देण्यात येणार नाहीत, असे या पत्रात म्हटले आहे.
- नितीशकुमार यांची हिटलरशी तुलना
पोलिसांच्या या पत्रानंतर बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे. आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी या पत्रानंतर सरकारवर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. तेजस्वी यांनी नितीशकुमार यांची तुलना थेट मुसोलिनी आणि हिटलरशी केली आहे. जर तुम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन केल्यास तुम्हाला नोकरी मिळणार नाही, मुसोलिनी आणि हिटलरला आव्हान देणारे नितीशकुमार सांगत आहेत. याचा अर्थ तुम्हाला नोकरीही देणार नाही आणि विरोधही करू देणार नाही असा होतो, अशी टीका तेजस्वी यांनी केली आहे.