ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर कणकवली येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर सरकारी वकिलांचा युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने मंगळवारी अपूर्ण राहिलेल्या या प्रकरणावर आज दुपारी 3 वाजता सिंधुदुर्ग न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. या प्रकरणावर न्यायालय काय निकाल देतयं यावर राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक होऊ घातली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाआघाडीचे प्रचारप्रमुख आणि शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणी पोलीसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. हा हल्ला नितेश राणेंच्या सांगण्यावरुन झाल्याचा आरोप फिर्यादी संतोष परब यांनी केलेला आहे.
दरम्यान, नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी या हल्ल्यात नितेश राणे आणि गोटय़ा सावंत यांचा कोणताही संबंध नाही. जिल्हा बँक निवडणूक संदर्भात जाणीवपूर्वक नितेश राणे यांच नाव गोवण्यात आले आहे, असा युक्तीवाद मंगळवारी न्यायालयात केला. नितेश राणे दोन वेळ पोलीस चौकशीसाठी पोलीस स्थानकात हजर होते. मात्र, नितेश राणे यांनी मंत्री आदित्य ठाकरे सभागृहात जात असताना जो आवाज काढला त्याचा राग ठेऊन त्याला नितेश राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आहे. तब्बल तीन तास हा युक्तीवाद सुरू होता. अखेर न्यायालयाने ही सुनावणी आजवर ढकलली. त्यामुळे आज दुपारी यावर निर्णय होणार आहे.