१० दिवसात जिल्हा कोर्टात हजर होण्याचे निर्देश
ऑनलाईन टीम/तरुण भारत
सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना शरण येण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे.नितेश राणेंना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयातही नितेश राणेंना जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाकडूनही नितेश राणे यांना दिलासा मिळालेला नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतील शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला होता. त्याविरोधात राणेंनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. ज्येष्ठ वकील मुकूल रोहोतगी त्यांची बाजू मांडत होते. मात्र, आज त्यांना फक्त १० दिवसांचा दिलासा मिळाला आहे. १० दिवसात जिल्हा कोर्टात हजर न झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
नितेश राणेंची अटकपूर्व जामीनासाठी धावपळ सुरू होती. मात्र, त्यांना हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दणका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे यापुढे राणे अटक केल्यानंतर जामीनासाठी अर्ज करू शकतात. तसेच त्यांना न्यायालयात हजर व्हावं लागणार आहे