प्रतिनिधी/ निपाणी
केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱया टप्प्यात काहीसे निर्बंध शिथिल केल्यानंतर विविध राज्यातून नागरिकांनी निपाणीत प्रवेश केला आहे. त्यापैकी 42 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून याचे अहवाल दोन दिवसात मिळणार आहेत. सदर 42 जणांना शहरानजीकच्या तवंदी घाटातील मोरारजी देसाई वसतीगृहात क्वारंटाईन करण्यात आले आहे.
4 मे पासून लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर निपाणीत शहर व तसेच विविध भागातील भाविक जे राजस्थान अजमेर येथे दर्शनासाठी गेले होते, अशा 38 भाविकांचे निपाणी हद्दीत आगमन होताच त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच बेंगळूरहून राजस्थानला जाणाऱया कुटुंबातील 5 जणांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. या 43 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून एक-दोन दिवसात त्याचा अहवाल येणार आहे.
मुंबईहून हासनला जाताना निपाणीत आलेल्या कंटेनरमधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे गेल्या महिन्यात स्पष्ट झाले होते. त्यामुळे सावध झालेल्या प्रशासनाने आता निपाणी भागात अन्य राज्यातून आलेल्या तसेच अन्य जिल्हय़ातून आलेल्या प्रवाशांची तात्काळ तपासणी करुन त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. तसेच आठ ते दहा जणांना होम क्वारंटाईन केले जात असल्याचे आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले.