प्रतिनिधी/ निपाणी
येथील महान अवलिया पिरानेपीर दस्तगीरसाहेब यांच्या दर्गाचा मुख्य उरुस शुक्रवारी झाला. तत्पुर्वी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केवळ धार्मिक विधी पार पडले. गलेफ चढविणे, गंध चढविणे, नैवेद्य दाखविणे आदी विधी झाले.
गुरुवारी सायंकाळी गंध चव्हाणवाडय़ातून दर्गाहमध्ये आणण्यात आला. मध्यरात्रीपर्यंत अत्यंत कमी प्रमाणात दंडवत घालण्यात आले. कोरोनामुळे सामाजिक अंतराचे पालन करण्यात आले. यंदा दर्गाह परिसरात मिठाईची दुकाने तसेच मनोरंजनाच्या साधनांना नगरपालिका व पोलीस प्रशासनाने मज्जाव केला होता. पै-पाहुणे देखील मोजकेच होते.
भाविक व फकिरांची संख्याही तुरळक
निपाणीच्या उरुसास दरवर्षी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा येथून भाविक येतात. पण, यंदा याचे प्रमाण अत्यंत तुरळक होते. निपाणी उरुसास कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, संकेश्वर, बेळगाव भागातून फकीर येतात. मात्र, फकिरांची संख्याही कमी दिसून आली. दरवर्षी उरुसास तीनशे पेक्षा अधिक फकीर येत होते.
शुक्रवारी पहाटे चव्हाण वाडय़ातून गलेफ चढविण्यात आला. दर्गाह परिसरात केवळ आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. गुरुवारी बेडिवाल्यांचा उरुस झाला. उरुस काळात दर्गाह परिसरात निपाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. सोमवारी उरुसाचा शेवटचा दिवस असून शनिवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत चव्हाण वारसदार यांच्या हस्ते चव्हाणवाडा येथे उदी व खारीक वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी चव्हाण वारसदार व मानकरी लवाजम्यासह संत बाबा महाराज चव्हाण यांच्या समाधीस अभिषेक, गोडा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे. याचदिवशी उरुसाची समाप्ती होणार आहे.