प्रतिनिधी/ निपाणी
निपाणी शहरात गेल्या दहा दिवसात 18 जणांचा कोरोनाने बळी घेतला असून कोरोना मृतांचा आलेख वाढताच असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. शुक्रवारी सायंकाळी दोन तर शनिवारी आणखी तिघांचा बळी गेला आहे. दरम्यान कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींवर निपाणीतील एकता फाऊंडेशन व राष्ट्रकर्म संस्थेच्या स्वयंसेवकांकडून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याबरोबरच बळीसत्रही सुरूच आहे. असे असले तरी अद्याप वाढत्या कोरोना संसर्गाचे गांभीर्य नागरिकांमध्ये नसल्याचे दिसून येते. शनिवारी मृतांमध्ये एका नारळ व्यावसायिक महिलेचा समावेश आहे.
निपाणीतील माणिकनगरात गेल्या आठ दिवसांपूर्वी विवाह समारंभानिमित्त एकत्रित आलेल्या 37 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी 19 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. या 19 पैकी 7 जण निपाणी माणिकनगरातील एकाच कुटुंबातील होते. यातील तिघांवर बेळगाव व निपाणी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान यातील एका नारळ व्यावसायिक महिलेचा उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा मृत्यू झाला.
याबरोबरच शुक्रवारी भिवशी येथील एका 68 वर्षीय व्यक्तीचा व श्रीनगर येथील एका 62 वर्षीय महिलेचाही कोरोनाने मृत्यू झाला. तर शनिवारी शेडबाळ येथील 76 वर्षीय महिलेचा व शिरगुप्पी (ता. निपाणी) येथील 58 वर्षीय पुरुषाचा निपाणी येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
निपाणी शहरासह तालुक्यात कोरोना संसर्ग वाढतच चालला आहे. असे असतानाही नागरिक सकाळच्या सत्रात विनाकारण बाहेर पडताना कोरोना नियमांचे उल्लंघन करत आहेत. यातून त्याचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. आतापर्यंत शहरात हरिनगर, शिवाजीनगर, शानेदिवाण गल्ली, आझाद गल्ली, भीमनगर, माणिकनगर, शिंत्रे कॉलनी, राम नगर, पार्वती क्रॉस, ढोर गल्ली, श्रीनगर, साईशंकर नगर, चव्हाणवाडी याठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. परिसरात पालिकेच्या वतीने औषध फवारणी करण्यात येत आहे.