प्रतिनिधी/ निपाणी
पूरग्रस्तांना मिळणाऱया भरपाईवरून अजूनही निपाणी तालुक्यात सावळा गोंधळ असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी सायंकाळी नुकसान भरपाईसंदर्भात विचारणा करण्यासाठी ममदापूर के. एल. येथील पूरग्रस्त व ग्रा. पं. पदाधिकारी आले होते. मात्र यावेळी पूरग्रस्त व तहसीलदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी पूरग्रस्तांनी पाच तास तहसीलदार कार्यालयात ठिय्या मांडला होता.
पाच महिन्यांपूर्वी निपाणी परिसराला अतिवृष्टी व महापुराचा जोरदार तडाखा बसला. यामुळे निपाणी तालुक्यातील हजारो घरे कोसळून कुटुंबे उघडय़ावर पडली होती. मात्र त्यानंतर पूरग्रस्तांना नुकसानभरपाई तात्काळ मिळवून देण्यात प्रशासन कमी पडले. यातच पडलेल्या घरांचा सर्व्हे प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र या सर्व्हेतही पक्षपातीपणा झाल्याचा आरोप अनेक ठिकाणी झाला. ममदापूर के.एल. येथेही अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले होते. मात्र त्याचा सर्व्हे चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच गावातील अनेक पूरग्रस्तांना अद्याप नुकसानभरपाईची एक रुपयाची रक्कमही मिळालेली नाही. त्यामुळे यासंदर्भात विचारणा करण्यासाठी ग्रा. पं. पदाधिकारी व पूरग्रस्त गुरुवारी सायंकाळी निपाणी तहसीलदार कार्यालयात आले होते. यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड व पूरग्रस्तांमध्ये जोरदार वादावादी झाल्याचे पहायला मिळाले. यामुळे तात्काळ शहर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक कुमार हडकर यांनी तहसीलदार कार्यालयात धाव घेतली.
दरम्यान रात्री 10 वाजेपर्यंत पूरग्रस्तांनी तहसीलदार कार्यालयात ठिय्या मांडला होता. मात्र प्रशासनाने म्हणावे तसे लक्ष न दिल्याने पुन्हा सोमवारी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्धार पूरग्रस्तांनी केला आहे. एकूणच निपाणी तालुक्यात पूरग्रस्त निधीमध्ये निर्माण झालेला हा सावळा गोंधळ दूर होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.
तहसीलदारांकडून उडवाउडवीची उत्तरे
ममदापूर ग्रा. पं. उपाध्यक्ष निरंजन पाटील म्हणाले, ममदापुरातील अनेक पूरग्रस्तांना अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने याची विचारणा करण्यासाठी आपण पूरग्रस्तांसमवेत तहसीलदार कार्यालयात गेलो होतो. मात्र तहसीलदारांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. तसेच आमच्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. तसेच पूरग्रस्तांसह आम्हाला अटक करण्याचा प्रयत्न होता. मात्र पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी. यासाठी पुन्हा सोमवारी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत, असे सांगितले.
सरकारकडून पर्याय दिल्यानंतर एंट्री
यासंदर्भात बोलताना तहसीलदार प्रकाश गायकवाड म्हणाले, सुरुवातीच्या टप्प्यात आवश्यक कागदपत्रे नसल्याने तालुक्यात सुमारे 500 पूरग्रस्तांच्या नुकसानीची नोंदणी न झाल्याने त्यांना भरपाई मिळालेली नाही. यामध्ये ममदापूर येथील पूरग्रस्तांचाही समावेश आहे. त्यांना नुकसान भरपाईसाठी सुरुवातीला नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीची प्रक्रिया अद्याप सरकारकडून सुरू झालेली नाही. ती सुरू होताच आवश्यक माहिती अपलोड करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे सांगितले.