परतीच्या पावसामुळे सत्य उघडय़ावर : ओढे, नाले, गटारीत प्लास्टिकचा खच
वार्ताहर/ निपाणी
निपाणी शहर कचरा व प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नगरपालिकेने गेल्या काही महिन्यांपूर्वी विविध उपक्रम राबविले. प्लास्टिक बंदीसाठी व्यावसायिकांवर छापे टाकताना दंडात्मक कारवाई केली. पण सद्यस्थिती पाहता या प्लास्टिक बंदीचे तीनतेरा वाजले असून परतीच्या पावसाने हे सत्य उघडय़ावर पाडताना नगरपालिकेच्या डोळय़ात अंजनच घातले आहे.
नुकताच परतीचा पाऊस झाला. या परतीच्या पावसाने गटरी, ओढे, नाले, तुडुंब भरून वाहले. आता सर्व काही खुले झाले असून वाहणारे पाणीही थांबले आहे. पण अशा गटारी, ओढे, नाल्यांच्या शेवटी पाहिले असता अनेक ठिकाणी प्लास्टिकचा अक्षरशः खच पडला आहे. या पडलेल्या प्लास्टिकमुळे प्रदूषण तर होत आहेच. त्याचबरोबर प्लास्टिक बंदी कागदावरच राहिल्याचे विदारक चित्र दिसत आहे.
नगरपालिकेने प्लास्टिक बंदीचा नारा देताना नागरिकांची जागृती केली. प्लास्टिक बंदीचे महत्त्व विशद करताना प्लास्टिकमुळे होणारा धोका समोर आणला. पण प्लास्टिक वापराची पदोपदी सवय जडलेल्या नागरिकांना याचा पर्याय मात्र दिला नाही. म्हणूनच कारवाई थंड होताच व्यावसायिकांनी ग्राहकांच्या सोयीसाठी प्लास्टिक वापर सुरु केला. यामुळेच सध्या प्लास्टिकचा वापर सऱहास सुरु झाला असून बंदी फक्त नावापुरती मर्यादीत राहिली आहे.