सदलग्यात पावसाने शाळू, हरभरा, गहू पिकाचे नुकसान : घरांवरील पत्रेही गेले उडून
प्रतिनिधी/ निपाणी
गेल्या आठवडय़ाभरापासून हुलकावणी देणाऱया वळीव पावसाने शनिवारी सायंकाळी निपाणीत सुखद बरसात केली. त्यामुळे कडाक्याच्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसून आले.
लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडण्यावर बंधन आले आहे. अशातच विजेचा होत असलेला लंपडाव व वातावरणात वाढत चाललेला उष्णतेचा पारा यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. सकाळी 10 नंतर तापमान वाढीची झळ बसत आहे. यातच गेला आठवडाभर तीव्र उष्णता व ढगाळ वातावरण असे चित्र परिसरात दिसून येत होते. यातच गेल्या आठवडय़ात ग्रामीण भागात काही प्रमाणात वळीवाच्या सरी बरसल्या होत्या. मात्र शहर व उपनगरात वळीवाने हुलकावणी दिली होती. दरम्यान शनिवारीही वातावरणात उष्णता अधिक जाणवत होती. यातच दुपारी 3 नंतर वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण झाले. 3.30 नंतर विजेच्या कडकडाटासह वळीवाच्या सरी बरसल्या.
सदलगा शहरासह काही भागात वादळी पाऊस
सदलगा : सदलगा शहरासह परिसरातील बहिणाकवाडी, वडगोल, नेज, चिकोडी तालुक्मयांसह काही भागाला विजांच्या कडकडाटासह सलग 3 तीन दिवस वळीव पावसाने झोडपले. आज सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले. झाडे कोसळल्याच्या व वीज पडल्याच्या ही घटना घडल्या आहेत.
सदलगा परिसरात हंगामातील सलग 3 तीन दिवस वळीवाच्या पावसाने हजेरी लावल्याने कापलेल्या शाळू, हरभरा, गहू खपली व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. सदलगा येथील महादेव करगळे यांच्या 1 एकर शेतातील ऊस हा पूर्णपणे जमीनदोस्त झाला असल्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. सदलगा व परिसरात काहीकाळ वीजपुरवठा खंडित झाला होता. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.