प्रतिनिधी/ निपाणी
सीमालढय़ातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 1956 पासून प्रत्येकवर्षी 17 जानेवारी हा मराठी भाषिकांतर्फे हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. यंदा मात्र हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी कार्यकर्त्यांना नोटीस देऊन भीती दाखवण्याचा प्रयत्न झाला. मात्र निपाणीत शुक्रवारी मराठी भाषिकांच्यावतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी मराठी भाषिकांनी आपापले व्यवहार बंद ठेवून हुतात्म्यांना अभिवादन करण्याबरोबरच महाराष्ट्रात जाण्याच्या भावना दाखवून दिल्या.
प्रारंभी सकाळी 10 वाजता बेळगाव नाका आवारातील बॅ. नाथ पै चौकात सीमालढय़ातील अग्रणी बॅ. नाथ पै यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना म. ए. समितीचे जयराम मिरजकर म्हणाले, स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना करताना मराठी भाषिक असलेला हा सीमाभाग तत्कालीन केंद्र सरकारच्या अन्यायामुळे म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला. याविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन होताना उसळलेल्या दंगलीत अनेकांना हौतात्म्य आले.
सीमालढय़ात बॅ. नाथ पै यांचे बहुमोल योगदान हे सीमावासीयांना नेहमीच प्रेरणा देत राहील. तसेच निपाणीतील हुतात्मा कमळाबाई मोहिते व गोपाळ अप्पू चौगुले यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. यासाठी यापुढेही मराठी भाषिकांनी एकजुटीने हा लढा लढावा, असे आवाहन केले. शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे यांनी, सीमालढय़ात बलिदान दिलेल्या हुतात्मा कमळाबाई मोहिते यांच्या स्मारक निर्मितीसाठी नगरपालिकेने तत्काळ पावले उचलावीत यासाठी सर्वांनी मिळून आवाज उठवण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, राजेंद चव्हाण, माजी सभापती किरण कोकरे, हरिष तारळे, दिलावर गडकरी, रमेश निकम, किरण पावले, पिंटू सूर्यवंशी, पप्पू सूर्यवंशी, सुजित बुडके, नंदकिशोर कंगळे, राजेंद्र कंगळे, बाळू हजारे, प्रताप पाटील, प्रा. एन. आय. खोत, बी. टी. तराळ, अविनाश शिंदे, अनिल यादव, भरत इंदलकर यांच्यासह मराठी भाषिक कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वत्र शुकशुकाट
दरम्यान हुतात्मा दिनामुळे निपाणीत कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन म. ए. समिती, शिवसेना व मराठी भाषिकांच्यावतीने करण्यात आले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शुक्रवारी निपाणीत 100 टक्के बंद पाळण्यात आला. यावेळी शहरातील जुना पी. बी. रोड, मुरगूड रोड, चिकोडी रोड, अशोकनगर, बेळगाव नाका परिसर, नेहरु चौक, चाटे मार्केट, जुना मोटर स्टॅण्ड आदी भागातील दुकाने बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळाला. दुपारपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आल्यानंतर दुपारनंतर व्यवहार बऱयापैकी सुरळीत झाले.