लॉकडाऊनमुळे दीड महिन्यांपासून बससेवा बंद : सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान
प्रतिनिधी / निपाणी
कोरोनाची दुसरी लाट पसरल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून 27 एप्रिलपासून सार्वजनिक बससेवा बंद ठेवण्यात आली. अशा स्थितीत आता कोरोनाची लाट ओसरल्यानंतर राज्यभरात पुढील आठवडय़ापासून अनलॉक होण्याची शक्यता आहे. गेल्या दीड महिन्यापासून बससेवा बंद असल्याने निपाणी आगार परिसर सुनासुना दिसत आहे. याकाळात आगाराचे सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान झाले असून लॉकडाऊनचे निर्बंध कधी शिथिल होतात याच्या प्रतीक्षेत निपाणी आगार असल्याचे चित्र दिसत आहे.
सीमाभागातील प्रमुख आगार असल्याने निपाणी आगाराकडून कर्नाटक परिवहनला मोठय़ा प्रमाणात उत्पन्न मिळते. लॉकडाऊन नसताना येथे दररोज सुमारे 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. गेल्यावर्षी 22 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर पेल्यानंतर सुमारे अडीच महिने बससेवा बंद होती. जूननंतर टप्प्याटप्प्याने लांब पल्ल्याच्या व स्थानिक मार्गावरील बस सुरू करण्यात आल्या. तरी देखील संसर्गाच्या भीतीपोटी प्रवाशांनी बसकडे पाठ फिरविली होती. दिवाळीनंतर प्रवाशांची वर्दळ वाढत असतानाच पुन्हा यंदा कोरोनाची दुसरी लाट पसरल्याने बससेवा बंद ठेवावी लागली आहे.
सध्या 14 जूननंतर निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बससेवा सुरू होईल, अशी शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर निपाणी आगारतर्फे आवश्यक पूर्वतयारी केली जात आहे. दीड महिना एका जागेवर थांबून असलेल्या बसेसची किरकोळ दुरुस्ती कामे केली जात आहेत. तसेच आगारातील चालक व वाहकांची स्वॅब चाचणी घेतली जात आहे. निपाणी आगारात सुमारे 550 कर्मचारी कार्यरत असून s बससेवा बंद असल्याने सदर कर्मचाऱयांना सुमारे 60 टक्के वेतन देण्यात आलेले आहे.
कर्मचाऱयांना यापूर्वीच कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. निर्बंध शिथिल झाल्यानंतर बससेवा सुरू होणार असली तरी सुरुवातीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळण्याची शक्यता गृहित धरून 50 टक्के क्षमतेनेच बस सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या दीड महिन्यात दैनंदिन फेऱयांच्या माध्यमातून होणारे सुमारे चार कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.
त्याबरोबरच सौंदत्ती यल्लम्मा देवीची यात्राही रद्द झाल्याने आगाराचे सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
त्यापार्श्वभूमीवर आगार प्रशासनाला निर्बंध शिथिल होण्याची प्रतीक्षा लागली आहे.