तालुक्यातील जनजीवन विस्कळीत : वेदगंगा, दूधगंगा नद्या पात्राबाहेर : शेतवाडीत पाणी शिरल्याने पिकांना फटका
प्रतिनिधी / निपाणी
पाणलोट क्षेत्रात सुरू असलेली अतिवृष्टी, निपाणी-चिकोडी तालुक्यात बुधवारपासून संततधार सुरू असलेली बरसात यामुळे वेदगंगा, दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. याबरोबरच ओढय़ा-नाल्यांनाही मोठय़ा प्रमाणात पाणी येताना अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. नद्यांचे पाणी शेतवाडीत शिरल्याने पिके पाण्याखाली जावून शेतकऱयांना फटका बसला आहे. एकंदरीत संततधार पावसामुळे निपाणी, चिकोडी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
वेदगंगा नदीवर असलेल्या जत्राट-भिवशी, सिदनाळ-अकोळ, कुन्नूर-भोजवाडी बंधाऱयावर पाणी आले आहे. तसेच दूधगंगा नदीवरील बारवाड-कुन्नूर, कारदगा-भोज, मलिकवाड-दत्तवाड हे तिन्ही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे या बंधाऱयावरील वाहतूक ठप्प झाली आहे. याबरोबरच निपाणी-इचलकरंजी आंतरराज्य मार्गावरील लखनापूर ओढा आणि अकोळ ओढय़ावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे अनेक वाहनधारकांना खडकलाट मार्गे ये-जा करावी लागली.
बससेवाही कोलमडली
बुधवारी रात्रीपासून निपाणी परिसरात पावसाने जोर पकडल्याने तालुक्यातील ओढय़ा-नाल्यांना मोठय़ा प्रमाणात पाणी आले. निपाणी-इचलकरंजी मार्गावरील लखनापूर व अकोळ ओढय़ावर पाणी आले. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. यामुळे या मार्गावरून निपाणी आगाराच्या बसची वाहतूक थांबवावी लागली. बोरगाव, भोज, बेडकिहाळ, सदलगा या बसफेऱया थांबवाव्या लागल्या. तसेच अकोळ-सिदनाळ आणि कारदगा-भोज बंधाऱयावरही पाणी आल्याने या मार्गावरील बसही सोडण्यात आल्या नाहीत. यामुळे कोरोना काळात बससेवा ठप्प होताना आगाराला फटका बसला होता. आता पावसाने बसफेऱया रद्द कराव्या लागल्याने आगार नुकसानीत भरच पडली.