चिकोडीत तहसीलदार उतरले रस्त्यावर
दिलेल्या आदेशानुसार शनिवार सकाळपासून निपाणीत कडक विकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली असून प्रशासनाने नागरिकांची वर्दळ थांबावी यासाठी शहरात अंतर्गत जोडणारे सुमारे 12 रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना एखाद्या ठिकाणी जायचे असल्यास लांबून वळसा घेऊन जावे लागत होते. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद व सहकार्य देणे गरजेचे आहे.
प्रशासनाने शुक्रवारी रात्री निपाणी शहराला मुरगूडकडून जोडणारा रस्ता देवचंद महाविद्यालयानजीक बंद केला आहे. याशिवाय खरीकॉर्नर, बेळगाव नाका, कोर्ट परिसर, बसवेश्वर सर्कल, कोठीवाले कॉर्नर, अशोकनगर, निपाणी मेडिकल, राजश्री टॉकीज कॉर्नर, कित्तूर चन्नम्मा सर्कल, सटवाई रोड आदी ठिकाणी जाणारे रस्ते लोखंडी जाळी लावून बंद केले आहेत. याशिवाय निपाणी पोलीस व नगरपालिका प्रशासन रस्त्यावर कोणीही विनाकारण फिरु नये यासाठी लक्ष ठेवून नियम मोडणाऱयांवर कारवाई करत आहेत.
गत 25 दिवसात निपाणी शहर व तालुक्यात उपलब्ध माहितीनुसार 135 हून अधिक जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे नागरिकांतून भीतीचे वातावरण व्यक्त होत आहे. सरकारने कोरोना साखळी तोडण्यासाठी कडक नियम करून देखील बेजबाबदार नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने आणखी कडक निर्णय घेत विविध गावात अंतर्गत होणारी वाहतूक रोखण्यासाठी लोखंडी जाळी लावून रस्ते बंद केल्याचे दिसून येत आहे. विनाकारण फिरत असल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा निपाणी पोलिसांकडून देण्यात आला आहे.
अनावश्यक फिरु नका, अन्यथा कारवाई
चिकोडी ः कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात वाढत असून तो नियंत्रित करण्यासाठी राज्य व तालुका प्रशासनाकडून विविध कठोर निर्बंध घालण्यात येत आहेत. असे असतानाही चिकोडी शहरात अनावश्यक वाहनधारकांची रस्त्यावर वर्दळ दिसून येत असल्याने चिकोडी-निपाणी राज्य महामार्गावर तहसीलदार प्रवीण जैन व पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील यांनी वाहने अडवून अनावश्यक रस्त्यावर न फिरण्याची समज दिली. तसेच रस्त्यावर अनावश्यक फिरताना आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.
चिकोडी शहरात अंकलीखूट, बसवेश्वर सर्कल, नगरपालिका व बसस्थानकासमोर अशा ठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहनधारकांची अडवणूक करण्यात येत आहे. शहरांतर्गत वाहतुकीची थोडीशी मुभा दिली असली तरी शहराबाहेर ये-जा करणाऱया वाहनांची मात्र चौकशी करण्यात येत आहे. कोरोना नियमांचे पालन करून लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांनी रस्त्यावर येऊन अनावश्यक फिरणाऱया वाहनधारकांना नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती केली.
350 वाहने जप्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुकारलेल्या लॉकडाऊनच्या नियमावलीचे पालन न करता नियमांचे उल्लंघन करीत अनावश्यकपणे, विनामास्क रस्त्यावर वाहने घेऊन फिरणाऱयांवर कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत 350 हून अधिक दुचाकी व चारचाकी वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती चिकोडीचे मंडल पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील यांनी दिली.
चिकोडी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. वाहने घेऊन अनावश्यक फिरू नये अशी सूचना देण्यात येऊनही अनावश्यकपणे रस्त्यावर फिरत असलेली चारचाकी व दुचाकी वाहने पकडण्यात आली आहेत. कोरोनाचे नियम पाळावेत यासाठी पोलीस रस्त्यावर उतरून कार्य करीत आहेत. चिकोडी तालुक्मयात अनावश्यक रस्त्यावर फिरणारी वाहने जप्त करण्यात येत आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनावश्यक वाहने रस्त्यावर येणार नाहीत यासाठी पोलीस सज्ज करण्यात आले आहेत. नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
रामदुर्गमध्ये विनाकारण फिरणाऱयांकडून दंड वसुली
रामदुर्ग ः कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊनची घोषणा केल्याने शनिवारी पोलिसांनी फिल्डवर उतरून वाहनसंचार नियंत्रणात आणले. आज विकेंड लॉकडाऊनमुळे औषध दुकाने व दूध विक्रीस मात्र मुभा दिली होती. त्यामुळे औषध दुकाने व दूध विक्री केंद्र सुरू होती मात्र बाकी सर्व व्यवहार बंद होते. शहरातील प्रमुख मार्गावर व चौकामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱयांकडून दंड वसूल करण्यात येत असल्याचे दिसून आले. तहसीलदार मल्लिकार्जुन हेगनवर, डीवायएसपी रामनगौडा हट्टी, सीपीआय शशिकांत वर्मा शहरात फिरून पाहणी केली व नागरिकांना विनाकारण न फिरण्याचे आवाहन केले.