वार्ताहर/ कारदगा
निपाणी तालुक्यातील मांगूर येथील 47 वषीय कोरोनाबाधित महिलेचा मंगळवारी कोल्हापूर येथील सीपीआर येथे मृत्यू झाला. तिच्या संपर्कात 20 हून अधिक जण आले असून 5 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर तिचा पती आणि मुलग्याला कोल्हापुरात क्वारंटाईन करण्यात आले असून तिथे त्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. गाव चार दिवस सीलडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान निपाणी तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी गेल्याने तालुक्यात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत प्रशासनाकडून मिळालेली माहिती अशी, सदर महिलेने काहीशी तब्बेत बिघडल्यानंतर चार दिवसांपूर्वी कुन्नूर येथील एका खासगी दवाखान्यात उपचार घेतले. यानंतरही आजार कमी न झाल्याने त्या महिलेला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे जाण्यास सांगितले होते. त्यानुसार सदर महिलेला कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखविण्यात आले होते. तेथून रविवारी सीपीआर इस्पितळात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी तिचा स्वॅबही तपासणीसाठी घेण्यात आला होता. तिची तब्बेत स्थिर होती. मात्र अचानक मंगळवार सायंकाळी सदर महिलेचा मृत्यू झाला. मंगळवारी तिच्या मृत्यूनंतर स्वॅब अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.
सदर महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती मांगूर गावात समजताच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर मांगूर ग्रामपंचायत प्रशासनाने सतर्कता आणि खबरदारी म्हणून बुधवार दि. .8 पासून शनिवार दि. 11 अखेर गाव पूर्णपणे सीलडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान गावातील वैद्यकीय व मेडिकल सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. याबरोबरच कुन्नूर येथे सुरवातीला महिलेवर उपचार करणाऱया डॉक्टरला होमक्वारंटाईन करण्यात आले आहे.
सदर महिलेच्या प्राथमिक संपर्कात 7 तर द्वितीय संपर्कात 15 जण आले असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याचे समजते. ग्रामपंचायत परिसर, बिरदेव मंदिर गल्ली, खोत गल्ली हा परिसर 14 दिवसांसाठी सीलडाऊन करण्यात आला आहे. सदर महिलेच्या पश्चात पती, दोन मुले, सासू असा परिवार असून खबरदारी म्हणून महिलेवर कोल्हापुरातच अंत्यसंस्कार उरकण्यात आले.
ग्रा.पं. अध्यक्ष आण्णासो जळणे यांनी, कोणीही घाबरून जाऊ नये, घराबाहेर विनाकारण पडू नये, प्रत्येकाने सतर्कता बाळगावी, कोरोना संदर्भात कोणतीही लक्षणे आढळल्यास ताबडतोब ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. मांगूर ग्रामपंचायत प्रशासन, सदलगा पोलीस स्थानकाचे पीएसआय आर. वाय. बिळगी व पोलीस कर्मचारी, मांगूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडून खबरदारी घेतली जात आहे.
महिलेला संसर्ग कोठून?
समजलेल्या माहितीनुसार सदर महिला लॉकडाऊननंतर कोठेही बाहेर गेलेली नाही. असे असताना या महिलेला नेमकी लागण कोठून झाली. हेच अद्याप स्पष्ट न झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंत मांगूर गावात सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. मात्र अचानक सदर महिलेचा मृत्यू कोरोनाने झाल्याचा अहवाल येताच अवघ्या 10 मिनिटात सर्व गाव बंद झाल्याचे पहायला मिळाले.