प्रतिनिधी / निपाणी :
आपला जन्म निपाणीत झाला. महाराष्ट्रात महिलांच्या हक्कासाठी आपण अनेक आंदोलने केली. या आंदोलनाचे बाळकडू निपाणीत मिळाले. आपण लहान असताना सीमाप्रश्नासह विविध आंदोलने आपल्या डोळय़ासमोर झाली. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सीमाप्रश्न सुटावा व बेळगाव, निपाणी महाराष्ट्रात यावे हीच इच्छा असल्याचे मत महाराष्ट्रातील भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले.
निपाणीत कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देसाई पुढे म्हणाल्या, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळे संस्काराची कमतरता नव्हती. आज ही पद्धत हरवत चालली आहे. याबरोबरच मोबाईलचा अतिरेक वापर या कारणामुळे बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. यासाठी पॉर्न साईट्सवर बंदी घालणे आवश्यक आहे. तसेच बलात्काराच्या घटनांवर जलदगतीने सुनावणी होऊन दोषींवर सहा महिन्यात फाशीची कारवाई होणारा कायदा केंद्राने करण्याची गरज आहे.
भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून महिला जागृती, अंधश्रद्धा निर्मूलन याबरोबरच दारूबंदी व ताईगिरी पथकही निर्माण केले आहे. कोडणी येथे बालिकेवर झालेली अत्याचाराची घटना दुर्दैवी व संतापजनक असून त्याचा फॉरेन्सिक अहवाल तीन महिने झाला तरी आलेला नाही. हा अहवाल आल्यानंतरच सरकारी मदत मिळू शकते. त्यामुळे फॉरेन्सिक अहवाल तातडीने मिळून कुटुंबास आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी विद्यमान मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी जयराम मिरजकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.