शास्त्रज्ञ डॉ. दीपक आपटे यांची माहिती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
समुद्राच्या पाण्याची अनेक ठिकाणी पातळी वाढत आहे. त्यावर उपाय म्हणून संरक्षक बंधारे बांधण्यात येत आहेत. संरक्षित झालेली जमीन शेतीसाठी वापरण्यात येत आहे. पर्यावरणदृष्टय़ा ही बाब चुकीची आहे. खारे, निमखारे पाणी जमिनीवर आले तरी त्या क्षेत्रात तयार होणारी अनेक पिके आता पुढे येत आहेत. यासाठी लोकांनी विचार बदलून अशा स्वरुपातील पिके घेण्याचा विचार केला पाहिजे, असे प्रतिपादन विख्यात शास्त्रज्ञ डॉ. दीपक आपटे यांनी केले.
डॉ. आपटे यांनी यापूर्वी रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण किनाऱयावर प्राणी व वनस्पती यांच्यासंदर्भात अनेक वर्षे संशोधन कार्य केले आहे. ते पूर्वी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेत कार्यरत होते. सध्या ते सृष्टी कन्झर्वेशन फाऊंडेशनचे संचालक म्हणून काम करत आहेत. सागरी पर्यावरणाविषयी त्यांची मते विशेष दखलपात्र समजली जातात. ते म्हणाले, खारजमीन बंधारे अनेक ठिकाणी बांधले जातात. त्यामुळे तयार होणाऱया जमिनीचे पट्टे विविध पिकाखाली आणले जातात. हा जुना विचार झाला. आता समुद्राचे किंवा खाडीचे पाणी जमिनीच्या भागात शिरत असले तर बंधारा बांधण्याऐवजी अशा पाण्यावर येणारी पिके घेण्याचे तंत्रज्ञान पेंद्र सरकारच्या विविध संस्थांनी पुढे आणले आहे. स्वामीनाथन फाऊंडेशनसारख्या प्रख्यात संस्थांनीही यावर खूप काम केले आहे. विविध पिके अशा क्षेत्रात घेतली जाऊ शकतात, हे आता सिद्ध झाले आहे.
ते पुढे म्हणाले, लोकांची मानसिकता बदलणे हा मोठा मुद्दा आहे. खारे पाणी अडवून पारंपरिक शेती करण्याऐवजी तिवराच्या झाडापासून विविध उत्पादने घेणे शक्य आहे. मधुमक्षिका पालन असेल अथवा फळापासून लोणच्यासारखे विविध प्रकार बनवणे शक्य आहे. त्याकडे वळण्याचा विचार लोकांनी करावा. सुंदरबन क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात तिवरांमध्ये मधुमक्षिका पालन हा उद्योग सुरु आहे. या झाडांपासून औषधे चहा बनतो. या क्षेत्रात रंगीत माशांचे पालन करणे, हा व्यवसायही आर्थिक उभारी देऊ शकतो.
पर्यावरणाची पुनर्स्थापना हा मुद्दा यावर्षी पर्यावरण दिनानिमित्त ठरवण्यात आला आहे. बंधाऱयांसारखी नवीन बांधकामे करण्याऐवजी तेथील जागेशी सुसंगत पिके घेणे हीच पर्यावरणाची पुनर्स्थापना आहे. वाळू उत्खननासारखे मोठे धोके किनारी पर्यावरणासाठी उभे आहेत. त्याचा विचार झाला पाहिजे. केवळ वृक्ष लागवड म्हणजे पर्यावरण जतन असे नाही. कोणत्या ठिकाणी कसल्या प्रकारच्या वृक्षांची लागवड केली पाहिजे, याचे शास्त्र आहे. वृक्ष कोठे नसले पाहिजेत, हे ही निरीक्षणातून पुढे आले आहे. ठाणे खाडीत फ्लेमिंगो पक्षी येत असतात. ते तिवरांच्या परिसरात बसलेले दिसणार नाहीत. फ्लेमिंगोसाठी चांगले अधिवास हवे असतील तर तेथे तिवरांची लागवड करून चालणार नाही. काही ठिकाणची तिवरांची झाडे काढणेही आवश्यक असते. वनखात्याच्या सल्ला समित्यांच्या माध्यमातून तसे निर्णय घेणे शक्य होईल. या सर्वांसाठी लोकांची मानसिकता तयार करणे, हे मोठे काम असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित करून सांगितले.