प्रतिनिधी / पंढरपूर
तुम्ही संतजनी । माझी करा विनवणी ।।
तैसे माझे दंडवत । निरोप सांगतील संत ।।
संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओवीत सध्याच्या प्रत्येक वारकरी भक्तांची अवस्था दडलेली आहे. कारण सध्या केवळ संत विठुरायांच्या चरणी दंडवत घालतील. आणि वारकऱ्यांच्या मनातील निरोप पोहोचवतील. असेच या अभंगामध्ये विषद करण्यात आले आहे. याच अभंगाची प्रचिती घडावी यासाठी प्रमुख संतांच्या पादुका एकादशीच्या सोहळयासाठी पंढरीत येउन विसावल्या आहेत.आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला संपूर्ण पंढरी नगरी निमर्नुष्य आहे. यामध्येच संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे संतांच्या पादुकांचे स्वागत देखिल यंदा पंढरीत वारकऱ्यांच्या अनुपस्थित झाले. तर मुख्यमंत्री हे आषाढीसाठी रात्री उशीराने वाहनातून पंढरीत दाखल झाले.
कोरोनाची जगभर महामारी सुरू असताना. बुधवारी पंढरपूरात एकादशीचा अनुपम्य सोहळा वारक-यांविना होणार आहे. यासाठी संतांच्या पादुका २० व्यक्तींसह संध्याकाळी उशिराने पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. तर पंढरपूरात देखिल मंगळवारी दुपारपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच शहरातील नागरीकही यंदा घरातच राहणार आहेत.आषाढी एकादशीसाठी पंढरीत मानांच्या ९ संतांच्या पादुकांसमवेत प्रत्येकी २० व्यक्ती आले आहेत. एकादशीच्या पूर्वसंध्येलाच पंढरपूरात कोरोनाचे ९ रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे संपूर्ण पंढरी नगरीवर कोरोनाचे सावट आहे. अशातच कुठल्याही प्रकारच्या हरिनामांचा आसंमती निनादणारा जयघोष नाही. यामधे सध्या केवळ १५०० पोलिसांचा बंदोबस्तच पंढरीत दिसून येतो आहे.
सद्यस्थितीत पंढरीची चंद्रभागा आणि मंदिर परिसरात सध्या भयाण अशी शांतता आहे. ना कुठला टाळ मुदुंगाचा ताल… ना हरिनामांचा गजर… असे कुठलेच चित्र पंढरीत सध्या अनुभवायला मिळत नाही. ऐरवी पंधरा लाख लोकांकडून होणारा गजर पंढरीत नसल्यांने संपूर्ण पंढरी नगरी ही ‘सुन्नी-सुन्नी’ झाली आहे. विशेष म्हणजे इतिहासातील पहिलीच अशी निमर्नुष्य वारी पंढरीत घडत आहे.
विणेकरी ठरले मानांचे वारकरी
विठोबाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यासोबत मानाचे वारकरी म्हणून मंदिरातील विणेकरी विठठल बडे हे उपस्थित राहणार आहे. यंदा वारकरी नसल्यांने मानांच्या वारकऱ्यांचा शोध घेणे अवघड होते. पण मंदिरामधे लॉकडाउनच्या काळात सेवा बजावणारे वारकरी विठठल बडे हयांना मंदिर समितीने मानांचा वारकरी म्हणून संधी दिली आहे.