लॉकडाऊननंतर एसटीची अवस्था बिकटच
पूर्वी 2400 फेऱया सुटायच्या, आता फक्त सातशेच फेऱया
प्रत्येक दिवशी वीस लाख रुपये उत्पन्न कमी मिळते
प्रतिनिधी / कणकवली:
22 मार्च रोजी करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर दोन महिन्यांनी एसटी सेवा सुरू झाली. मात्र, एसटीला हाताच्या बोटावर मोजण्याएवढेही प्रवासी मिळत नव्हते. एसटी सेवा सुरू होऊन जवळपास चार महिन्यांचा कालावधी होत आला, तरीही एसटीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. अद्याप एसटीमधून क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी वाहतूक करण्यात येत असून हे 50 टक्के प्रवासीही मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग विभागाला लॉकडाऊनपूर्वी मिळणाऱया मिळणाऱया उत्पन्नापेक्षा जवळपास 20 लाख रुपये प्रत्येक दिवशी उत्पन्न कमी मिळत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
रा. प. महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाकडून लॉकडाऊनपूर्वी दररोज सुमारे 2400 च्या जवळपास फेऱया सुटत होत्या. यातून या विभागाला प्रत्येक दिवशी 25 लाखांच्या जवळपास उत्पन्न मिळत होते. मात्र, 22 मार्च रोजी लॉकडाऊन झाल्यानंतर एसटी सेवा पूर्णत: बंद करण्यात आली.
22 मेपासून जिल्हय़ांतर्गत फेऱया सुरू
नंतरच्या कालावधीत म्हणजे 22 मेपासून जिल्हय़ांतर्गत काही फेऱया सुरू करण्यात आल्या. सुरुवातीला बराच कालावधी या फेऱयांना प्रतिसादच मिळत नव्हता. गणेशोत्सवापूर्वी काही प्रमाणात बसेस गावपातळीवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊनपूर्वी रोज 2400 च्या जवळपास सुटणाऱया फेऱया आज सरासरी 700 फेऱयाच सुटत आहेत. मात्र, त्याही फेऱयांना अपेक्षित प्रतिसाद नसल्याचे दिसून येते.
सप्टेंबरमध्ये 26 टक्के भारमान
लॉकडाऊनपूर्वी एसटीच्या या विभागात सरासरी 50 ते 55 टक्के भारमान मिळत होते. त्यावेळी जिल्हय़ाचे प्रत्येक दिवशीचे उत्पन्न सुमारे 25 लाखांच्या जवळपास होते. आता मुळातच 50 टक्के प्रवासी क्षमता आणलेली असतानाही 25 ते 28 टक्के भारमान मिळत आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होत असल्याचे दिसत आहे. सध्या या विभागाला दिवसाला केवळ 5 लाखांच्या जवळपासच उत्पन्न मिळत आहे. सप्टेंबर महिन्याच्या पंधरवडय़ाचा विचार केला, तर जवळपास 26 टक्के भारमान मिळाल्याचे दिसून येते.
संपूर्ण राज्यातच एसटीची अवस्था बिकट
मुळातच क्षमतेच्या 100 टक्केने प्रवासी वाहतूक सुरू असताना तोटय़ात असलेले एसटी महामंडळ आता पुरते अडचणीत सापडले आहे. प्रत्येक दिवशी 20 लाख रुपयांच्या जवळपास उत्पन्नात घट होत असल्याने व राज्यभर अशीच स्थिती असल्याने रा. प. महामंडळ अडचणीत सापडण्याचीच शक्यता अधिक आहे.
कर्मचारी पगारापासून वंचित दरम्यान, महामंडळाच्या या घटत्या उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर रा. प. महामंडळाच्या कर्मचाऱयांना जुलै व ऑगस्ट महिन्यांचा पगार अद्याप झालेला नाही. शासनाकडून महामंडळाला आर्थिक मदतीचा हात तातडीने देऊन कर्मचाऱयांचे पगार अदा करावेत, अशी मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे.