नव्या बाधितांचा आकडा स्थिर किंवा उतरणीकडे – दुसऱया लाटेपासून मुक्तीचे स्पष्ट संकेत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या दीड महिन्यापासून सातत्याने चढत्या क्रमाने वाढत जाणारी नव्या बाधितांची आकडेवारी आता स्थिर होऊन उतरणीकडे लागली आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात तर आता नव्या बाधितांपेक्षा डिस्चार्ज मिळणाऱयांचा आकडा वाढला आहे. महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, छत्तिसगड, गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि झारखंड या नऊ राज्यांमधील परिस्थिती झपाटय़ाने सुधारत असल्याने देश दुसऱया लाटेच्या विळख्यातून लवकरच मुक्त होईल, असे संकेत मिळत असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य विभागाच्या अतिरिक्त सचिव आरती आहुजा यांनी दिले आहे.
देशात दिवसागणिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसत असला तरी कोरोनावर मात करणाऱयांचे म्हणजे डिस्चार्ज मिळणाऱयांचे प्रमाण वाढत असल्याने आता हळूहळू दिलासादायी चित्र निर्माण होऊ लागले आहे. विशेषतः मध्य भारत आणि उत्तरेकडील राज्यांमधील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत चालली असली तरी दक्षिणेकडील राज्यांमध्ये नव्या बाधितांची संख्या वाढत आहे. कर्नाटक-केरळ या राज्यांमध्ये सध्या सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. तसेच तामिळनाडू, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, हरियाणा, ओडिशा आणि उत्तराखंड या राज्यांमधील संसर्गाची सद्यस्थिती चिंताजनक असल्याचे आरोग्य सचिव आहुजा यांनी नमूद केले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालायने शुक्रवारी पत्रकार परिषद घेत कोरोनाने निर्माण झालेल्या राज्यनिहाय स्थितीची माहिती दिली. देशातील 12 राज्यांमध्ये एक लाखाहून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर 7 राज्यांमध्ये 50 हजार ते 1 लाखादरम्यान सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आरती आहुजा यांनी दिली.
गेल्या 24 तासात देशात 4,14,188 नवे बाधित
आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 14 हजार 188 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच 3 हजार 915 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत देशात 3 लाख 31 हजार 507 जणांना डिस्चार्ज मिळाला असून आतापर्यंत 1 कोटी 76 लाख 12 हजार 351 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. दरम्यान, देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 16 कोटी 49 लाख 73 हजार 58 लसीचे डोस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
भारतात सध्या 36 लाख 45 हजार 164 सक्रिय रुग्ण असून ते विविध इस्पितळांमध्ये उपचार घेत आहेत. तसेच आतापर्यंत एकंदर 2 कोटी 14 लाख 91 हजार 598 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 2 लाख 34 हजार 83 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मागील दहा दिवसांमध्ये देशात 36 हजार 110 जणांचा मृत्यू झाला असून, तासाला सरासरी 150 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 10 दिवसांच्या कालखंडात कोणत्याही देशात इतक्मया मोठय़ा संख्येने मृत्यू होण्याचा हा उच्चांक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, याआधी अमेरिकेत 10 दिवसांत सर्वाधिक 34 हजार 798 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. यानंतर ब्राझीलचा क्रमांक होता. ब्राझीलमध्ये 32 हजार 692 मृत्यू झाले होते. पण भारताने अमेरिका आणि ब्राझीलला मागे टाकले आहे.