बेळगाव / प्रतिनिधी
नियमबाहय़ वाहनधारकांवर कारवाईचे सत्र शहर रहदारी पोलिसांनी सुरू ठेवले आहे. येथील अरगन तलावनजीक असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळय़ाजवळ रहदारी पोलीस नियमबाहय़ वाहनधारकांची अडवणूक करून दंडात्मक कारवाई करत आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणाऱया वाहनधारकांना शिस्त लागली आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन विविध मार्गानी प्रयत्न करत आहे. मात्र, दुसरीकडे वाहनधारक विनाहेल्मेट व विनामास्क फिरताना दिसत आहेत. काही चार चाकी वाहनचालक नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविताना दिसत आहेत. अशा वाहनधारकांची अडवणूक करून वाहनासंबंधी कागदपत्रांची चौकशी केली जात आहे. बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर सातत्याने नियमबाहय़ वाहनधारकांवर कारवाई सत्र सुरूच असल्याने शिस्त लागली आहे. पोलिसांनी आपल्या कारवाईत सातत्य ठेवल्याने समाधान व्यक्त होत आहे. या मार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यातच काही युवक विनाहेल्मेट सुसाट गाडय़ा चालविणे, स्टंटबाजी करणे, मोठा आवाज करणे असे नियमबाहय़ प्रकार करताना दिसत आहेत. अशा वाहनधारकांना यामुळे चाप बसला आहे.