प्रतिनिधी / कोल्हापूर
अंबाबाई मंदिरात सुरक्षा व्यवस्था असलीच पाहिजे मात्र सुरक्षा व्यवस्थेची अंमलबजावणी करताना नियमांचा अतिरेक करण्याची गरज नाही. असा अतिरेक करणाऱया पोलीस अधिकारी, कर्मचाऱयांवर कारवाई करण्याच्या सूचना गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी वरिष्ठ अधिकाऱयांना दिल्या. विना पास भाविकांना दर्शनासाठी सोडणाऱयांवरही कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.
मंत्री देसाई मंगळवारी करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी मंदिर परिसराच्या सुरक्षेची पाहणी करून आढावाही घेतला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. दर्शन घेतल्यानंतर मंत्री देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेल्यांचा राज्यात हस्तक्षेप वाढला असल्याची टीका मंत्री देसाई यांनी केली. ते म्हणाले, भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आरोप करतात आणि त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा तातडीने दुसऱया दिवशी तपासाचे काम सुरू करतात. पण राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भक्कम आहे. ते खंबीर विचारावर वाटचाल करत आहे. विरोधकांनी कधीही आडकाठी आणली तरी हे सरकार कुणाच्याही मागे फरफटत जाणार नाही, असेही मंत्री देसाई म्हणाले.मंत्री अनिल परब यांनी अंबाबाईचे व्हीआयपी दर्शन घेताना मंदिर परिसरात पादत्राणे काढली असल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारीत झाली होती. त्याविषयी विचारले असता मंत्री देसाई यांनी अनावधानाने परब यांच्याकडून तसा प्रकार घडला असावा, अशी टिप्पण्णी केली.
मंदिर भाविकांसाठी की पोलिसांसाठी
मंत्री देसाई दर्शनाला येणार असल्याने मंदिराची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्याशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा वादही झाला. मंदिर भाविकांसाठी आहे की पोलिसांसाठी आहे, असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला. विना ई-पास दर्शनाला सोडले जाते, सुरक्षेचा अतिरेक केला जातो, तुम्ही आल्यानंतर सुरक्षेचा फार्स केला जात आहे, अशा प्रश्नांची सरबत्ती पत्रकारांनी केली. यावेळी शाब्दिक चकमकही झाली. त्यानंतर मंत्री देसाई यांनी सीसीटीव्हीचे फूटेज पाहून संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना दिल्याचे सांगितले.