वार्ताहर/ ताम्हाने
वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहन चालकांवर देवरुख पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. 10 डिसेंबरपर्यंत 100 हून अधिक वाहनचालकांवर कारवाई करुन 25 हजार 700 रुपये दंडात्मक वसूली केली आहे. यामुळे बेदरकार वाहनचालकांना चांगलाच चाप बसला आहे.
अनेक वाहन चालक नियमभंग करत असतात. अशांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. पोलिस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 6 डिसेंबरपासून यासाठी सहय़ाद्रीनगर, सावरकर चौक, कांजिवरा आदी भागात पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी 6 डिसेंबर रोजी 24 चालकांकडून 5 हजार 800 रुपये, 7 रोजी 30 जणांवरील कारवाईत 7 हजार 100 रुपये, 8 रोजी 17 वाहनांवरील कारवाईत 3 हजार 400 रुपये, 9 रोजी 26 वाहनचालकाकडून 5 हजार, तर 10 रोजी 22 वाहनचालकांकडून 4 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पहिल्या पाच दिवसातच 120 वाहनचालकांवर कारवाई करत 25 हजार 700 रुपयांची दंडात्मक कारवाई देवरुख पोलिसांतर्फे करण्यात आली आहे.