मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचा इशारा : बेंगळुरात पत्रकारांशी संवाद, तज्ञांशी बैठक : खबरदारीच्या उपाययोजनांवर चर्चा
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. परिणामी, कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्याचा सरकारचा विचार नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. जर कोरोना नियमांचे पालन न केल्यास पुन्हा लॉकडाऊन करणे अनिवार्य आहे, असा इशारा मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दिला आहे. बेंगळूरच्या डॉलर्स कॉलनीतील आपल्या निवासस्थानामध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्यात दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. जर याकडे दुर्लक्ष केल्यास लॉकडाऊन करण्याशिवाय सरकारकडे पर्याय उरणार नाही. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे. सध्या लॉकडाऊनबाबत प्रस्ताव नाही. लॉकडाऊन व रात्रीचा कर्फ्यू जारी होऊ नये, यासाठी नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून रविवारी राज्यभरात 934 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सोमवारी तज्ञांची बैठक बोलावली आहे. विधानसौधमध्ये सायंकाळी 5 वाजता होणाऱया बैठकीत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. के. सुधाकर, कोविड तांत्रिक समिती सदस्य व वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.
राज्यातील काही जिल्हय़ांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे यावर नियंत्रण आणण्यासाठी खबरदारी व उपाययोजनांवर बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर काही कठोर निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. तसेच बैठकीत मुख्यमंत्री येडियुराप्पा ज्या सूचना देतील, त्याप्रमाणे उपाययोजना करण्यात येणार आहेत. खबरदारीच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री येडियुराप्पा तज्ञांच्या सूचनाही ऐकून घेणार असून त्यानुसार पुढील नियमावली जारी करण्यात येणार असल्याचेही समजते.
कर्फ्यूबाबत कोणतीच चर्चा नाही
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्फ्यू किंवा नाईट कर्फ्यू जारी करण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले. बेंगळुरात ते पत्रकारांशी बोलत होते. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सोमवारी बैठक बोलावली असून चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.