खानापूर नगरपंचायतीच्या पहिल्या सर्वसाधारण बैठकीत जुनी मोटरही दुरुस्त करण्याचा ठराव
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱया दोन विद्युत मोटरपैकी केवळ एकच मोटर सुरू असल्याने शहरात गेले पंधरा महिने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. नियमित पाणीपुरवठा सुरू व्हावा, अशी जनतेकडून वरचेवर मागणी होत असल्याने नवीन पन्नास अश्वशक्तीची विद्युत मोटर खरेदी करण्याबरोबरच जुनी विद्युत मोटरही दुरुस्त करुन शहराला दररोज पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरू करावा, असा ठराव बुधवारी खानापूर नगरपंचायतीच्या पहिल्या सर्वसाधारण बैठकीत केला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मजहर खानापुरी होते.
मुख्याधिकारी विवेक बन्ने यांनी सदस्यांचे स्वागत केल्यावर विद्यमान नगरसेवक व माजी नगराध्यक्ष रफिक खानापुरी, सिद्धोजी गावडे यांच्या निधनाबद्दल दु:खवटा व्यक्त केला. यानंतर नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचे कर्मचाऱयांतर्फे स्वागत केले. यानंतर विषय पत्रिकेवरील प्रत्येक विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यात आले. शहराच्या विकासासाठी पंधरावा वित्त आयोगाकडून 99 लाख रुपये अनुदान मंजूर केले आहे. त्यामधून हाती घेण्यात येणाऱया विकासकामाला जिल्हाधिकाऱयांकडून परवानगी मिळाली आहे. यासाठी आता नगरसेवकांची मंजुरी आवश्यक असल्याने ती मंजुरी मिळावी, अशी विनंती मुख्याधिकारी विवेक बन्ने यांनी केली. व त्यामधून हाती घेणाऱया विकासकामांची माहिती दिली. पण विकासकामाच्या सुचीला नगरसेवकांनी आक्षेप घेतला. व नव्याने विकासकामे नगरसेवकांकडून करुन घ्यावी, नंतरच आम्ही मंजुरी देवू, अशी मागणी नगरसेवकांनी केल्यामुळे विकासकामांची सादर केलेली यादी रद्द करुन आता नव्याने यादी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
स्वच्छता अभियान खाली 5 लाखाचे अनुदान
स्वच्छता अभियान योजनेखाली 5 लाखाचे अनुदान मंजूर झाले आहे. त्यामधून प्रत्येक कुटुंबाला ओला व सुका कचरा साठवण्यासाठी दोन बादल्या दिल्या जाणार आहेत. तसेच शहरातील प्रत्येक घराला बादल्या पुरवण्यासाठी आवश्यक भासल्यास त्यामध्ये नगरपंचायतीच्या उत्पन्नातील रक्कमही खर्च करुन प्रत्येक घराला बादल्या पोचवाव्यात अशी सूचनाही बैठकीत नगरसेवकांनी केली.
प्रल्हाद रेमाणी मलप्रभा नदीघाट असे नाव द्यावे
मलप्रभा नदी घाटाला माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी मलप्रभा नदीघाट असे नाव देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. पण त्याचा फलक अद्याप नाही. तो बसवावा, अशी मागणी नगरसेविका सौ. राजश्री तोपिनकट्टी यांनी केली. गावातील स्वच्छतागृह व मुतारींच्या स्वच्छतेकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचेही निदर्शनास आणून दिले.
नगराध्यक्ष मजहर खानापुरी म्हणाले, माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांच्या नावाचा फलक तातडीने बसवण्याची सोय, स्वच्छतागृह व मुतारी नियमित स्वच्छ करण्यासाठी पावले उचलली जातील, अशी ग्वाही यावेळी दिली.
टिपू सुलतान चौकासंदर्भात नंतर निर्णय
बैठकीच्यावेळी भाजप युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली युवा कार्यकर्त्यांनी तसेच वाजपेयी नगरमधील जनतेच्या प्रतिनिधींनी मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी पंडित ओगले म्हणाले, पारिश्वाड क्रॉसला टिपू सुलतान चौक असे दिलेले नाव बदलून एपीजे अब्दुल कलाम चौक असे नाव देण्याबद्दल यापूर्वी आम्ही निवेदन दिले आहे. त्याबद्दल निर्णय घ्यावा, अशी विनंती केली. यावर नगरसेवक लक्ष्मण मादार म्हणाले, शहरातील प्रमुख नागरिक संघटना यांचेही मत आजमावून पुढील बैठकीत यावर योग्य निर्णय घेवू, असे मत व्यक्त केले.
नगरपंचायतीच्या या पहिल्या बैठकीत खेळीमेळीच्या वातावरणात प्रत्येक विषयावर चर्चा झाली. सर्व नगरसेवकांनी गटातटाचा विचार न करता एकसंघ राहून शहराच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. चर्चेत उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, नगसेवक सर्वश्री फातिमा बेपारी, तोईद चांदकन्नावर, नारायण ओगले, आप्पय्या कोडोळी, मिनाक्षी बैलूरकर, विनायक कलाल, लता पाटील, सायरा सनदी, नारायण मयेकर, शोभा गावडे, हणमंत पुजार, मेघा कुंदरगी, विनोद पाटील, शोभा भुतकी, रफिक वारीमणी आदींनी भाग घेतला.