तरुण भारत’शी बोलताना अश्विनी पाटील यांनी व्यक्त केले मत
प्रतिनिधी/ सातारा
चीनच्या ज्या वुहान शहरात कोरोनाचा कहर सुरू होता. त्याचवेळी सातारा शहरातली अश्विनी पाटील तेथे 33 दिवस अडकली होती. तेथून तिची सुटका सुखरूप केली. आज तिच्या त्या वुहानमधल्या आठवणी सातारा जिह्यातील कोरोनाचा वाढत चालेला आकडा पाहून जाग्या झाल्या. ती आपल्या मायदेशी, आपल्या आई वडिलांच्याजवळ असल्याने तिलाही आणि त्यांनाही आधार झाला आहे. प्रशासन प्रयत्न करतेच आहे पण सातारा जिह्यातील नागरिकांनी नियम पाळले तर कोरोना आटोक्यात येऊ शकतो, असे अश्विनी पाटील हिने ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
जेथे कोरोना या विषाणूचा शोध लागला त्या चीनच्या वुहान शहरात ऍब्रॉड येथील पतीसोबत दोन महिने सातारा येथील अश्विनीने काढले. त्यातील 33 दिवस हे लॉकडाऊनचे होते. या लॉकडाऊनमध्ये ना तिला चीन भाषा येत होती ना त्यांचे काही समजत होते. फक्त भारतीय इंग्रजी भाषा तिला समजत होती. फेब्रुवारी महिन्यात ती भारतात सुखरूप आली. दिल्ली आणि सातारा येथे क्वारंटाइन झाल्यानंतर ती आपल्या कुटुंबात रमली.
सातारा जिह्याने 30 हजारांचा आकडा गेल्यावर सहा महिन्यांनी तिथले आणि इथले वातावरण, तिथले लॉकडाऊन व इथले लॉकडाऊन याबाबत निश्चित कडू आठवणी अश्विनी पाटील यांनी जागवल्या. शेवटी स्वतःचा देश, स्वतःचं घर, स्वतःचं गाव हेच हक्काचे असते. ती म्हणते की मी बाहेर या काळात असते तर माझ्या आई बाबांची मला खूप काळजी वाटली असते. ते नीट मास्क लावतात की नाही, स्वच्छ हात धुतात की नाही, पण आता जवळ असल्याने मीच सारं करते. त्यांचा आधार वाटतो. पतीशी व्हाट्सअपवर दररोज बोलणं होत असतं.
अश्विनी पाटील म्हणाल्या, दिवाळीत जाण्याचा मनोदय आहे. पण शेवटी आई वडिल जवळ असावे असेही वाटते. सातारा जिह्यात कोरोना कमी येऊ शकतो. परंतु जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिलेले मास्क नियमानुसार वापरले गेले पाहिजेत. सामाजिक अंतर पाळले गेले पाहिजे. तरच कोरोनाचा संसर्ग कमी होईल, अशी शक्यता तिने वर्तवली. माझा आता पासपोर्ट आला असून त्याकरता पुण्याला जावे लागले होते. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे घराबाहेर पडत नाही, असे ही तिने ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.