निपाणीत प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
प्रतिनिधी/ निपाणी
गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. निपाणी भागातही कोरोना रुग्ण आढळू लागल्याने नागरिकांनी कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून कोरोनाचा वाढता संसर्ग टाळावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. निपाणी भाग हा महाराष्ट्राला लागूनच असल्याने याठिकाणीही कोरोनाचा संसर्ग फैलावू नये यासाठी नागरिकांनीच योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. अचानक रुग्णसंख्या वाढल्यास आरोग्य व्यवस्थेवर ताण पडून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रत्येकाने कोरोनाबाबतच्या नियमावलींचे पालन करणे गरजेचे आहे.
सध्या शहरात सरकारी आकडेवारीनुसार कोरोनाचे रुग्ण कमी दिसत असले तरी सत्य परिस्थिती भयावह आहे. शिवाय अनेक रुग्ण हे मोठय़ा शहरात तपासणी व उपचार करून घेत असल्याने खरी रुग्णसंख्या ही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याबाबत कोणताही हलगर्जीपणा न करता योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत उद्भवलेली स्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी प्रत्येकाने आपली स्वतःची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे.
शहरातील पाच हजार जणांना लस
निपाणी शहर व परिसरात आतापर्यंत 5 हजार जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. उर्वरित नागरिकांनीही लस घ्यावी, असे आवाहन महात्मा गांधी रुग्णालयाच्या वैद्याधिकारी डॉ. सीमा गुंजाळ यांनी केले आहे. केवळ लस घेतली म्हणजे कोरोना होणार नाही, असा गैरसमज बाळगू नये. लस घेतल्यानंतरही आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.