महिला वेगवान गोलंदाज शिखा पांडेचे मत, महिला क्रिकेटच्या नियमांत बदल करण्यास विरोध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महिला क्रिकेटकडे प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नियमावलीत कोणतेही अनावश्यक बदल करण्याची गरज नाही. त्याऐवजी मार्केटिंग व गुंतवणूक करण्यावर भर द्यावा, असे मत भारतीय महिला संघातील वरिष्ठ वेगवान गोलंदाज शिखा पांडेने व्यक्त केले आहे.
न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हाईन व भारताची नवोदित स्टार जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यात आयसीसी वेबिनारमध्ये चर्चा झाली, त्यावेळी महिला क्रिकेटमध्ये काही बदल त्यांनी सुचविले होते. सीमारेषा कमी करणे, खेळपट्टीची लांबी कमी करणे, चेंडूचा आकार व वजन कमी करणे, असे काही बदल त्यांनी सुचविले होते. पण शिखाला हे बदल अजिबात पसंद नसून हे बदल अनावश्यक असल्याने आयसीसीने महिला क्रिकेटच्या नियमावलीत कोणतेही बदल करू नयेत, असे तिने म्हटले आहे. गोव्याची 31 वर्षीय शिखा पांडे इंडियन एअरफोर्समध्ये सध्या अधिकारी म्हणून कार्यरत असून तिने 104 आंतरराष्ट्रीय सामन्यात 113 बळी मिळविले आहेत. झुलन गोस्वामी ही भारताची सर्वोत्तम वेगवान गोलंदाज असून तिच्यानंतर शिखाचेच नाव घेतले जाते.
महिलांसाठी हलका चेंडू व 20 यार्डाची खेळपट्टी म्हणजे काय असते, हे सांगताना तिने 100 मी. धावण्याच्या शर्यतीशी तुलना केली. ‘ऑलिम्पिकमध्ये महिला धावपटू 80 मी. धावून पहिले स्थान मिळविताना पुरुष धावपटूंइतकीच वेळ नोंदवू शकत नाही. तसाच प्रकार खेळपट्टीची लांबी करण्याबाबत होईल,’ असे तिने स्पष्ट केले. चेंडूचा आकार कमी करण्यास तिची सहमती आहे. पण त्याचे वजन कमी करण्याला तिचा विरोध आहे. महिला फलंदाज वजनदार चेंडूवर मोठे फटके मारू शकत नाहीत, हा समज तिने मान्य केला नाही. ती म्हणते, ‘कृपा करून सीमारेषा कमी करू नका. कारण अलीकडच्या काळात झालेल्या सामन्यांत जबरदस्त फटकेबाजी करून आम्ही आपली ताकद दाखवून दिली आहे. तेव्हा ही नुसती सुरुवात आहे, हे लक्षात ठेवा. आमच्यात याहून अधिक सुधारणा होणार हे नक्की. तेव्हा थोडा संयम राखा. आम्ही कौशल्यपूर्ण खेळाडू असून हळूहळू सुधारत होत आहोत,’ असेही शिखा म्हणाली.
नियमात बदल करून महिला क्रिकेटचा विकास करण्याला तिने हरकत घेतली असून त्याऐवजी जोरदार मार्पेंटिंगचा मार्ग अनुसरण्याचा सल्ला तिने दिला आहे. ‘खेळाचे योग्य प्रकारे मार्केटिंग करूनही वाढ, विकास साध्य करता येऊ शकतो. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नियम बदलण्याची गरज नाही. आम्ही जगभरात कुठेही खेळत असताना डीआरएस, स्निकोमीटर, हॉटस्पॉट, सर्व तांत्रिक बाबी आणि थेट प्रक्षेपण यांचा वापर का केला जाऊ नये,’ असा प्रश्न उपस्थित करताना तिने निम्नस्तरावरच या खेळात जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याच्या आवश्यकेतवर जोर दिला.
तिने आणखी एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा मांडला तो तुलनेचा. महिला क्रिकेटची पुरुष क्रिकेटशी अजिबात तुलना केली जाऊ नये. कारण दोन्ही खेळ मूलतः एकमेकांपासून वेगळे असतात. सध्या आहे त्या स्थितीतही महिला क्रिकेटला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत तिने मेलबर्नवर झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीचा उल्लेख केला. ‘या सामन्यासाठी 86,174 प्रेक्षकांनी मैदानात हजेरी लावली होती तर टीव्हीवर लाखो लोकांनी त्याचे प्रक्षेपण पाहिले आहे. त्यांना आमच्यांत काहीतरी स्पेशल असल्याचे दिसले म्हणूनच इतका प्रचंड प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला,’ असे तिने शेवटी नमूद केले.