नगराध्यक्ष संजू परब यांचा इशारा : अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन
वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी शहरातील बाजारपेठेत लोकांची वाढती गर्दी धोक्याचा इशारा आहे. शनिवारी बाजारपेठेत तुफान गर्दी होताच नगराध्यक्ष संजू परब यांनी तात्काळ अनावश्यक दुकाने बंद करण्याचा निर्णय घेत सोमवारपासून दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे न पाळल्यास सदर दुकानदारांना प्रथम नोटीस, समज देण्यात येईल. समज देऊनही गर्दी वाढत गेल्यास व नियमांची पायमल्ली झाल्यास सदर दुकान सील केले जाईल, असा इशारा पत्रकार परिषदेत दिला. सावंतवाडीत बाहेरून येणाऱयांची सीमेवरच सक्तीने आरोग्य तपासणी केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी उपस्थित होते.
बाजारपेठेतील दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात अशी सुरू करताच नागरिकांनी खरेदीसाठी झुंबड केली. लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. अत्यावश्यक सेवेसह कडधान्य व अन्न-धान्य दुकानदार नियम पाळत नाहीत. त्यामुळे पालिकेने कडक निर्बंध घातले आहेत. मेडिकल दुकाने व अन्य दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क घालणे आवश्यक आहे. सदर नियम पाळले नाहीत तर पालिका निरीक्षण करून नोटीस पाठवून दुकाने सील केली जातील. सध्या चाकरमानी मोठय़ा संख्येने येत आहेत. त्यामुळे शहरात धोका अधिक आहे. याचा विचार करून लोकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाजारपेठेत येऊ नये, असे आवाहनही परब यांनी केले.
होम क्वारंटाईनसाठी नगरसेवकांची शिफारस
शहरात गरोदर माता, अपंग, वयोवृद्ध, आजारी व्यक्ती आल्यास त्यांना होम क्वारंटाईन करण्याबाबत त्या व्यक्तीची तपासणी करून त्या वॉर्डमधील दोन नगरसेवक त्या घराची पाहणी करून होम क्वारंटाईन व्यक्तीचे प्रतिज्ञापत्र घेऊन नंतर क्वारंटाईन केले जाणार आहे. होम क्वारंटाईन व्यक्ती घराबाहेर दिसल्यास कारवाई अटळ आहे, असे परब यांनी स्पष्ट केले. शहरात हॉटेल व अन्य भागात पालिकेच्यावतीने होमगार्ड तैनात केले जातील. होमगार्ड व पोलीस पेट्रोलिंग करतील, असेही ते म्हणाले.