बैठकीतून थेट अधिकाऱयांना फोनाफोनी
प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नियोजन समितीची सभा ही सभापती स्नेहा नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत शहरातील लागलेल्या गळत्या, कमी दाबाने सुरु असलेला पाणी पुरवठा व गणेशखिंड येथील पाण्याच्या गळतीची समस्या यावर चर्चा झाली. तसेच शहरातील मंगळवार तळय़ाच्या रोडवरील अतिक्रमणे हटवण्यात यावीत, अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यानुसार कार्यवाही करण्यासाठी सभेतूनच सभापतींनी अधिकाऱयांना फोनाफोनी केली. .
सभेकरता स्मिता घोडके, लता पवार, रजनी जेधे यांच्यासह नगरसेविकांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये उपस्थित सदस्यांनी पाण्याच्या टंचाईवर चर्चा सुरु केली. करंजे भागात अनेक ठिकाणी व्हॉल्व्हमधून पाणी वाया जात आहे. ते पाणी वाया जावू नये नागरिकांना पाण्याची टंचाइं भेडसावू नये यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून कार्यवाही होणे गरजेचे आहे. तसेच गणेश खिंड येथीलही पाण्याची समस्या गेले कित्येक दिवस आहे. ती काढण्यासाठी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला वेळ नाही, अशा समस्या काहींनी मांडल्या. त्याच बरोबर मंगळवार तळे जाणाऱया रस्त्यावर अतिक्रमण झालेले आहे. वाहतूकीची कोंडी होत आहे. ही वाहतूकीची कोंडी काढण्यात यावी. नागरिक विनाकारण नगरसेवकांकडे सतत तक्रार करत नाही. अतिक्रमण हटाव विभाग काहीच कार्यवाही करत नाही, अशा तक्रारी आल्या आहेत. असे सांगताच बैठकीतूनच थेट फोन लावून अतिक्रमणे काढण्याच्या सुचना दिल्या आहेत.