सर्व प्रकल्प मार्गी लावणार : कोटय़वधीचा जादा निधी मिळणार – उदय सामंत
प्रतिनिधी / ओरोस:
नियोजन समितीच्या प्रारुप आराखडय़ातून एक रुपयाही कमी करू दिला जाणार नाही. उलटपक्षी सी-वर्ल्ड व अन्य प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कोटय़वधी रुपये आणले जातील, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. जिल्हा नियोजन समितीने सादर केलेल्या 2020-21 च्या 240 कोटीच्या आराखडय़ापैकी वित्त मंत्री अजित पवार यांनी केवळ 118 कोटी रुपयांनाच मंजुरी दिली आहे. यावरून अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. याबाबतची भूमिका सामंत यांनी स्पष्ट केली.
सी-वर्ल्डसारखा प्रकल्प अधांतरी आहे. तो कमी जागेत करण्यासाठी शासन तयार आहे. त्यामुळे कमी जागेत तो प्रत्यक्षात आणला जाईल. यासाठी स्वतंत्र निधी मिळेल. चांदा ते बांदा योजना सुरू ठेवण्याचे आश्वासन मिळाले आहे. पर्यटनासाठी महत्वपूर्ण ठरणाऱया मालवण, देवगड, कणकवली येथील गेस्ट हाऊससाठी प्रत्येकी एक कोटीची टोकन तरतूद करण्यात आली आहे. यासाठी कितीही रुपयांचा खर्च करण्यास शासन तयार आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
आंगणेवाडीसाठी 12 कोटी
मच्छींद्र कांबळी, शिवरामराजे भोसले स्मारक पूर्ण करण्याचा निर्णयही झाला आहे. आंगणेवाडी तीर्थक्षेत्रासाठी 12 कोटी रुपये दिले जाणार आहेत. 17 फेब्रुवारीच्या भराडी मातेच्या यात्रेला मुख्यमंत्री येणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. आंगणेवाडीप्रमाणेच कुणकेश्वर विकासासाठीही निधी दिला जाईल. कोटय़वधीचे प्रस्ताव द्या. सगळे पैसे देऊ, असे वित्तमंत्र्यांनी आश्वासित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विमानतळ प्रश्न लवकरच मार्गी
चिपी विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाणार आहे. ऍव्हीएशन ऍथॉरीटीला मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचे पत्र दिले आहे. येत्या 15 दिवसांत पाहणी करून अन्य अपूर्ण कामेही पूर्ण करून घेतली जातील. साकव दुरुस्तीच्या तरतुदीत भरघोस वाढ करण्यात आली असून साकवासाठी आता 50 लाख रुपये दिले जाणार आहेत. योग्य पद्धतीने भक्कम बांधकाम केले गेल्यास एसटी बसही त्यावरून नेता येईल, हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. दीपक केसरकर यांना विश्वासात घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली अधिकचा निधी आणू, असेही ते म्हणाले.
विकासकामांत तडजोड नाही!
विकासकामे करताना त्यात अडवणूकही करण्यात आली होती. मात्र कुणकेश्वर येथील अडवण्यात आलेले काम मार्गी लावण्यात आले आहे. तर जनसुविधेतून होऊ घातलेली तोंडवली बावशी ही ग्रामपंचायत पालकमंत्र्यांनी उद्घाटन करू नये, अशा प्रकारे वागण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता हे काम मार्गी लावले जाणार आहे. शनिवारी रात्री आठ वाजता आपण स्वत: हे उद्घाटन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विकासकामांत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.
नगरविकास राज्य मंत्री असताना रत्नागिरी जिल्हय़ात सहा कॉलेज आणली. मात्र स्वत:च्या संस्थेसाठी नाहीत, तर ती शासकीय आहेत. सिंधुदुर्ग जिल्हय़ातही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंजिनिअरिंग कॉलेज असावीत, असं आपलं मत आहे. शेतकरी आणि आर्थिक दुर्बलांसाठी ती महत्वपूर्ण ठरतील आणि त्यामुळेच ती आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.