मंत्री डॉ. के. सुधाकर यांची अधिकाऱयांना सूचना : आतापर्यंत 1.11 लाख कर्मचाऱयांनी घेतली लस
प्रतिनिधी / बेंगळूर
येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत कोरोना लसीकरणाचे निश्चित केलेले उदिष्ट पूर्ण झालेच पाहिजे, अशी सूचना आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी अधिकाऱयांना केली आहे. विधानसौध येथे जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायतींचे सीईओ, जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हा आरोग्य खात्याचे प्रमुख व वैद्यकीय महाविद्यालयांच्या सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
सुधाकर पुढे म्हणाले, काही जिल्हय़ांनी निश्चित केलेले उदिष्ट पूर्ण केले आहे. तर काही जिल्हय़ांना हे उदिष्ट गाठणे शक्य झालेले नाही. कोरोना प्रतिबंधक लस घेण्याची सूचना करून देखील काही जण उदासीन आहेत. पहिल्या टप्प्यात महसूल, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, शहरविकास, गृह खात्यासह अनेक खात्यातील अधिकारी व कोरोना योद्धय़ांना लस घेण्याची सूचना केली होती, असे ते म्हणाले.
आरोग्य-कुटुंब कल्याण खात्याकडून एकूण 4,24,539 कर्मचाऱयांची नोंदणी करण्यात आली होती. मात्र, काहींनी लस घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत केवळ 1,11,000 कर्मचाऱयांनी लस टोचून घेतली आहे. त्यामुळे उर्वरित आरोग्य कर्मचाऱयांनी तातडीने लस घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.
धारवाड, बेंगळूरमध्ये प्रमाण कमी
प्रामुख्याने बेंगळूर शहर, बागलकोट, दावणगेरे आणि धारवाड जिल्हय़ांमध्ये लसीकरणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. तर चिक्कबळ्ळापूरमध्ये 70 टक्के, कारवार 73 टक्के, चामराजनगर 70 टक्के, चिक्कमंगळूर जिल्हय़ाने 70 टक्के उदिष्ट पूर्ण केले आहे. आम्ही निश्चित केलेल्या वेळेपर्यंत 80 ते 90 टक्के उदिष्ट पूर्ण होणे गरजेचे होते. तसेच जागृती करूनही टक्केवारी कमी असल्याने मंत्री सुधाकर यांनी नाराजी व्यक्त केली.
70 टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झालेले जिल्हे
चिक्कबळ्ळापूर | 79 टक्के |
तुमकूर | 78 टक्के |
कारवार | 73 टक्के |
गदग व मंडय़ा | 71 टक्के |
चामराजनगर, चिक्कमंगळूर | 70 टक्के |
5 हजारपेक्षा अधिक जणांना लस देण्यात आलेले जिल्हे
तुमकूर | 10,898 |
बेंगळूर शहर | 10,777 |
बेळगाव | 10,036 |
म्हैसूर | 5,555 |
कारवार | 5,041 |