वार्ताहर / दाभाळ
तौक्ते चक्रीवादळाचा जबर फटका निरंकाल, बेतोडा, कोनशे व कोडार भागातील शेतकरी व बागायतदारांना बसला आहे. अनेक बागायतदारांच्या केळी, पोफळी, माड व इतर बागायती फळझाडे उन्मळून मोडून पडल्याने मोठय़ाप्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. कृषी खात्याने तातडीने या भागाची पाहणी करून नुकसानग्रस्त बागायतदारांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
चक्रीवादळामुळे येथील अनेक भागात मोठय़ा प्रमाणात झाडांची पडझड झाली. याचा जास्त फटका बागायतदारांना बसला असे कोनशे येथील प्रगतशील शेतकरी हेमंत सामंत यांनी सांगितले. त्यांच्या बागायतीमधील सुमारे पन्नासाहून अधिक केळी मोडून पडल्या. कित्येक पोफळीची झाडे आडवी झाली. त्यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले. यंदाच्या वर्षी अनेकवेळा निरंकाल भागातील बागायतदारांना वादळाचा फटका बसला. गेल्या फेब्रुवारी महिन्यात अशाचप्रकारे वादळी वाऱयामुळे निरंकाल भागातील बागायतीची हानी झाली होती. मोठय़ा मेहनतीने वसविलेल्या बागायती नैसर्गिक आपत्तीच्या कचाटय़ात सापडत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कृषी खात्याने या भागातील नुकसानग्रस्त बागायतदारांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.