वार्ताहर / दाभाळ
निरंकाल सातेरीमळ येथे मुख्य रस्त्यावर व मायणेवाडा येथील अंतर्गत रस्त्यावर वीजवाहिनी खाली आल्याने उंच वाहनांना तिचा स्पर्श होत असल्याने धोका निर्माण झाला आहे. वीज खात्याने या गोष्टीची त्वरित दखल घेऊन ही वीजवाहिनी सुरक्षित उंचीवर नेण्याची मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.
निरंकाल, दाभाळ या मुख्य रस्त्यावर सातेरीमळ येथे दोन ठिकाणी सातेरी मंदिराजवळच ही वीज वाहिनी धोकादायक स्थितीत आहे. रस्त्याच्या बाजूला घातलेले खांब जास्त अंतरावर असल्याने वीज वाहिन्या खाली आल्या आहेत व नेमक्या रस्त्याच्या मधोमध आल्याने उंच वाहनांना त्यांचा स्पर्श होत आहे. बेतोडा वीज केंद्रावरील कनिष्ठ अभियंते व कर्मचाऱयांना या धोकादायक वाहिन्यासंबंधी कल्पना देऊनही त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या महिन्यात गवताची गंजी वाहून नेणाऱया एका टेंपोला या वीजवाहिन्यांचा स्पर्श झाला होता. यावेळी वीज पुरवठा खंडीत असल्याने अपघात टळल्याचे नागरिकांनी सांगितले. या भागातून नियमितपणे ये-जा करणाऱया वाहनचालकांना या धोकादायक वीज वाहिन्यांची कल्पना असल्याने ते काळजी घेतात. मात्र एखाद्या अनोळखी वाहनांना धोका संभवतो आहे.