हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावलेल्या दीपिका पदुकोण नामक अभिनेत्रीने जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जाऊन आंदोलकांना सहानुभूतीपूर्वक भेट दिली, या (फारशा महत्त्वाच्या नसलेल्या) घटनेवरून सध्या प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे, वृत्तपत्रे आणि राजकीय वर्तुळात नको इतका गदारोळ उठविण्यात आलेला आहे. पदुकोण यांची ही भेट नेमकी कोणत्या उद्देशांसाठी होती हेही स्पष्ट नाही. कारण त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसमोर काही वक्तव्यही केले नाही. एक प्रकारे ही मूक भेट होती. तरीही तिची एवढी चर्चा होत असल्याने मतप्रदर्शन करणे आवश्यक ठरते. डाव्यांचे प्राबल्य असलेले हे विद्यापीठ नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेले असते. तेथे अध्ययन, संशोधन आणि ज्ञानसाधनेपेक्षा आंदोलनेच अधिक चालतात की काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. यापैकी सर्व आंदोलने राष्ट्रहिताच्या कारणास्तव चालतात असेही म्हणता येत नाही. सांप्रतच्या काळात या विद्यापीठात जे आंदोलन झाले ते वसतीगृहांचे शुल्क वाढविल्याच्या कारणावरून झाले. त्यानंतरचे आंदोलन नागरिकत्व कायदा सुधारणेवरून झाले. शुल्कवाढीविरूद्धचे आंदोलन निर्विवादपणे राष्ट्रीय कारणांसाठी नव्हते तर नागरिकत्व कायदा सुधारणेचा विषयही या देशातील कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकाशी संबंधित नाही तर तो अन्य काही देशांमधून भारतात आलेल्या कोणाला देशाचे नागरिकत्व द्यायचे व कोणाला नाही, यासंबंधी आहे. त्यामुळे त्यासंबंधी इतका आरडाओरडा केला जाणे अनाकलनीय आहे. या कायद्याविरोधातील आंदोलन देशहितापेक्षा मतपेढी मजबूत करण्यासाठी आहे, हे स्पष्ट आहे. ही आंदोलने सुरू असताना चार दिवसांपूर्वी काही मुखवटाधारी अज्ञातांनी विद्यापीठाच्या परिसरात घुसून तेथील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या प्रमुख आयशी घोष यांनाही मारहाण होऊन त्या रक्तबंबाळ झाल्याचे दिसले. तथापि, याच आयशी घोष यांनी त्यापूर्वी काही दिवस आपल्या काही साथीदारांसह विद्यापीठाच्या संगणक कक्षात घुसून तेथील सर्व्हरची तोडफोड केल्याचा आरोप आहे आणि या कृत्यासाठी त्यांच्याविरोधात तक्रारही सादर करण्यात आली आहे. हिंसाचार हा कोणीही केला असला तरी तो सभ्य नागरी संस्कृतीत निषिद्ध आणि निषेधार्हच मानला गेला पाहिजे. तथापि, आज स्वतःविरोधात हिंसाचार झाल्याची तक्रार करणाऱया डाव्या संघटना स्वतःही यासंदर्भात धुतल्या तांदळासारख्या स्वच्छ आहेत असे मुळीच नव्हे. त्यांच्यावरही अशा प्रकारचा हिंसाचार घडविल्याचे आरोप कित्येकदा झालेलेच आहेत. गुरूवारीच भारत बंदच्या निमित्ताने पश्चिम बंगालमध्ये जो हिंसाचार झाला तो डावे पक्ष आणि काँगेस यांनी संयुक्तरित्या केला, असा आरोप खुद्द राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. तसेच डावे व काँगेस यांच्या या ‘दुटप्पी’ धोरणाचा निषेध म्हणून त्यांनी 13 जानेवारीला दिल्लीत होणाऱया आणि सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय नागरिक सूचीला विरोध करण्यासाठी आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याची घोषणाही केली. याचाच अर्थ असा की, सरकारला नेमका कोणत्या संदर्भात आणि कशा प्रकारे विरोध करायचा, यावर विरोधी पक्षांमध्येच एकवाक्यता नाही. अशा स्थितीत एका बॉलिवुड अभिनेत्रीच्या विद्यापीठ भेटीला, आणि तिने सरकारविरोधी आंदोलकांना दर्शविलेल्या पाठिंब्याला इतकी प्रसिद्धी देणे, तसेच त्यावर इतकी चर्चा व मतप्रदर्शन होणे निरर्थक आहे. या अभिनेत्रीने ही भेट देऊन जणू काही क्रांती घडविली किंवा क्रांतीला चालना दिली असा सूर आळविणे तर हास्यास्पद आहे. एका अभिनेत्रीच्या उपस्थितीने आंदोलन बळकट झाले असे मानणे म्हणजे या आंदोलनाची मूळची शक्ती किती क्षीण होती याची कबुली दिल्यासारखेच आहे. दुसऱया बाजूने पाहता पदुकोण यांच्या या भेटीला समाजमाध्यमातून मोठा विरोध झाल्याचेही बघावयास मिळते. हा विरोधही तितकाच निरर्थक आहे. या अभिनेत्रीचा एक चित्रपट आज शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची जाहिरात करणे आणि वादग्रस्तता निर्माण करून स्वतःचीही प्रसिद्धी करून घेणे या उद्देशाने तिने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती असा आरोप होत असून तो अगदीच खोटा समजण्याचे कारण नाही. यापूर्वीही स्वतःबद्दल मुद्दाम वादग्रस्तता निर्माण करून घेऊन स्वतःच्या चित्रपटांबद्दल जनतेची उत्सुकता वाढविण्याचा प्रयत्न अनेक कलाकारांनी केला आहे. दीपिका पदुकोण यांनी नेमक्या कोणत्या उद्देशाने ही भेट दिली ते स्पष्ट झालेले नाही. कदाचित त्यांचा सद्हेतूही असू शकेल. पण त्यांचा ‘बिग बजेट’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच काही दिवस ही घटना घडल्याने त्यांच्या अंतस्थ हेतूबद्दल शंका उपस्थित होणे तितकेच स्वाभाविक मानले पाहिजे. अशा स्थितीत त्यांच्या या भेटीला विरोध करून त्यांना मोठी प्रसिद्धी मिळवून देणे याचा अर्थ त्यांचा उद्देश साध्य करण्यास हातभार लावणे असा होतो. एकंदरीतच, ही भेट इतक्या उलटसुलट चर्चेचा विषय बनण्याचे काही कारण नव्हते. प्रसार माध्यमांना अशा चटपटीत घटना हव्याच असतात. कारण सर्वसामान्यांना त्यांचे आकर्षण असते. याचा लाभ उठवून आपला टीआरपी वाढविण्यासाठी प्रसार माध्यमे आसुसलेली असतात. अलीकडच्या काळात बिनमहत्त्वाच्या घटनांना वारेमाप प्रसिद्धी देण्याचे प्रकार वाढले आहेत. ही ताजी घटना त्याचेच एक उदाहरण असून त्यापेक्षा त्याचे जास्त महत्त्व नाही. अशा भेटींचा आंदोलनांना फारसा लाभही होताना दिसत नाही, तसेच समाजही त्याकडे गांभीर्याने पहात नाही. लोक आता बरेच शहाणे झाले असून अशा घटनांमागील राजकारण ते नेमके ओळखतात. तरीही अशा घटना घडविणे आणि त्यांना प्रसिद्धी देणे हे मोह संबंधितांना टाळता येत नाहीत. प्रसिद्धीची आस आणि अपेक्षा प्रत्येकाला असते आणि नेहमी प्रसिद्धीच्या झोतातच वावरण्याची सवय असणाऱयांना तर ती आस अधिकच असते. त्यामागे किती वाहवत जायचे याचा निर्णय लोकांनी घ्यायचा असतो व लोक तो सद्सद्विवेकबुद्धीने घेतात असा अनुभव अनेकवेळा आला आहे. म्हणूनच ही घटना, तिला दोन्ही बाजूंकडून मिळालेली प्रसिद्धी व या घटनेसंबंधी झालेली चर्चा हा सर्वच खटाटोप निरर्थक होता व टाळता येण्यासारखा होता हे निश्चित आहे.