गौरी आवळे / सातारा :
निराधारांच्या व्यथा, त्यांच्या न्याय हक्कांचा आवाज बनलेल्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण अधिकारी रोहिणी ढवळे या खंबीरपणे वाटचाल करत आहेत. सातारा जिल्ह्यात त्यांच्या कामाचा डंका वाजत असून इतर जिल्ह्यातही त्यांच्या योजना राबविण्यात येत आहेत. बीएससी ऍग्री, एमएसडब्लु हे शिक्षण पूर्ण करून रोहिणी ढवळे यांनी निरीक्षण गृह (रिमांड होम) येथे 2007 ते 2009 पर्यंत अधीक्षक म्हणून काम केले. यावेळी त्यांनी निरीक्षण गृहातील मुलाचे योग्य संगोपन करण्यावर भर दिला.
जिल्हा महिला व बालकल्याण विभागात वर्ग 1 च्या पदावर रोहिणी ढवळे 2010 साली रुजु झाल्या. त्यांनी कामाचा पदभार स्वीकारताच महिला व बालकांसाठी नव्या योजना, नवी धोरणे राबविण्यास सुरूवात केली. त्यांनी स्वत: तीन बालमहोत्सवाचे आयोजन साताऱ्यात केले. चार विभागीय बालमहोत्सवापैकी तीन बालमहोत्सव त्यांनी स्वत: साताऱ्यात आयोजित केले होते. मुलांच्या सर्वांगिण विकासात भर पडली. जिल्ह्यातही कोरोनाची पहिली लाट आली. तेव्हा जिल्ह्यातील सर्व 11 बालगृह आणि 2 शासकीय संस्था यातील कर्मचारी, बालकांना कोरोनाची लागण होवू नये म्हणून सूक्ष्म नियोजन केले. यामुळे निरीक्षण गृहात कोरोनाचा शिरकाव झाला नाही.
कोरोनामुळे जे पुरूष पालक मृत्यूमुखी पडलेले आहेत. त्यांची मुले, कुटुंबातील सदस्यांना शासनाच्या योजना मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यामध्ये मुलांना बालसंगोपन योजना, पत्नीला संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब निवृत्ती वेतन योजनांचा लाभ देणारा सातारा जिल्हा पहिल्या स्थानी होता. कोरोनाची येणारी तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात आले. यामुळे मुलांच्या सुरक्षितेसाठी त्यांनी पहिल्यांदा माझी मुल माझी जबाबदारी ही संकल्पना मांडली. स्वत: त्या संकल्पनेवर काम करायला सुरूवात केली. त्यानंतर सर्व नियोजन झाल्यानंतर ते जिल्हा परिषदेकडे जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तांतरीत केले. आणि ही संकल्पना संपूर्ण जिह्यात राबविण्यास सुरूवात झाली. त्यांची ही भक्कमपणे चालणारी संकल्पना फक्त जिल्ह्यात नव्हे तर नाशिकच्या महसूल विभागात राबविण्यास आली. नाशिक विभाग आयुक्तांनी ही संकल्पना अशीच स्वीकारून पूर्ण नाशिकच्या पाचही जिल्ह्यामध्ये ती सुरू ठेवली आहे. त्यांची बदल सातारा जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी झाली.
दरवर्षी 1 ते 30 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण अभियान राबविण्यात येते. यावर्षी या कालावधीमध्ये विविध उपक्रमांचे नियोजन जिल्ह्यामध्ये केले होते. त्यामध्ये प्रामुख्याने किशोरी मुली, गर्भवती महिला स्तनदा माता व 0 ते 6 वयोगटातील बालके या घटकांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करून राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात आला. यामध्ये घरापर्यंत गृहभेटीच्या माध्यमातून आरोग्य, पोषण, आहार व स्वच्छतेबाबत जनजागृती व अंगणवाडी सेविका व मदतनीस इतर सहभागी विभाग, ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, नगरविकास यांच्याशी समन्वय साधून महिला व बाल विकास विभाग नोडल विभाग म्हणून काम पाहिले. त्यांनी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारून एक महिना झाला. आणि राष्ट्रीय पोषण अभियानात सातारा जिल्हा सलग दुसऱया वर्षी राज्यात अव्वल ठरला आहे. उत्तम नियोजन, योग्य कामाची पद्धत राबविण्यात त्या नेहमी यशस्वी ठरतात.
महिलांनी स्वावलंबी झाले पाहिजे
महिला घर ते नोकरी उत्तम पणे सांभाळु शकतात. यामुळे त्यांनी स्वावलंबी बनले पाहिजे. तेव्हाच त्यांच्या समस्या सुटतील. कोणत्याही क्षेत्रात खंबीरपणे वाटचाल करणे, स्वत: वर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. अधिकारी म्हणून काम करताना मी योग्य गोष्टी स्वीकारते. तर ज्या योग्य वाटत नाहीत. त्यांना विरोध करते. यामुळे कामात माझी ठोस भूमिका असते. – रोहिणी ढवळे, महिला व बाल कल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद