कोरोनामुळे पालक दगावलेल्या मुलांची घेण्यात येणार काळजी
प्रतिनिधी / बेळगाव
निराधार व अनाथ मुलांची कोरोनाकाळात काळजी घेण्यासाठी शाळांचा उपयोग करून तेथे पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. कोरोनामुळे ज्या मुलांचे पालक दगावले आहेत आणि त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही किंवा त्या परिसरात, शहरात बालसंगोपन केंद्र नसेल त्या ठिकाणी शाळांचा उपयोग करून घेऊन तेथे या मुलांचे विलगीकरण करण्यात येणार आहे.
निराधार व अनाथ मुलांचा प्रश्न सध्या गंभीर आहे. बहुसंख्य मुलांचे पालक कोरोनामुळे दगावले आहेत किंवा हॉस्पिटलमध्ये आहेत. अशा मुलांची काळजी सरकार घेणार आहे. लहान मुलांची मानसिकता बिघडणार नाही, याची काळजी घेऊनच ही योजना कार्यान्वित होणार आहे.
मुलांचे विलगीकरण करताना चाईल्ड हेल्पलाईन क्र. 1098 तसेच कामगार खात्याची, अंगणवाडी केंद्रे व तेथील स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. तसेच दवाखान्यातील पालकांची संमतीही घेतली जाणार आहे. ज्यांचे पालक दगावले आहेत अशा मुलांच्या पालकांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र बालसंरक्षण समितीला सादर करावे लागणार आहे. याशिवाय अशा मुलांच्या स्थावर आणि जंगम संपत्ती, विमा याबद्दलची माहिती जिल्हा कायदा प्राधिकारकडून घेऊन सादर करावी लागणार आहे.
यासाठी राज्यस्तरीय कोविड चाईल्ड प्रोटेक्शन टास्क फोर्स उभारण्यात येणार असून विविध खात्यातील 12 जणांची निवड केली जाणार आहे. महिला आणि बालकल्याण खात्याचे सचिव टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील. याचपद्धतीने जिल्हय़ामध्येही टास्क फोर्स स्थापन केले जाणार आहेत.